नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग जळगाव विभाग जळगाव व जी .टी .पाटील महाविद्यालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय मतदार दिवस’डॉ.एम. एस. वाघमारे यांच्या ‘सक्षम लोकशाहीसाठी सजग मतदान ‘या विषयाच्या व्याख्याना द्वारे संपन्न झाला .यावेळी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव द. रा. कहार ,जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण व संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी यांची आभासी पटला द्वारे प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ.संतोष चव्हाण यांनी नवमतदारांना आवाहन करून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून घ्या व येणाऱ्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क कर्तव्यभावना जोपासून बजवावा असे आवाहन करून आयोजन भूमिका स्पष्ट केली. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव द. रा .कहार यांनी महाराष्ट्र शासनाने उच्च तंत्र शिक्षण विभागाने मतदार जनजागृती अभियानात मतदान जनजागृती साठी जे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जात आहेत, त्यांची माहिती देऊन महाविद्यालयीन युवकांनी या विविध उपक्रमात सहभागी होऊन हे अभियान शंभर टक्के यशस्वी करावे असे आवाहन केले .प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागाचे डॉ. एम. एस. वाघमारे यांनी व्यवस्थेच्या परिवर्तनासाठी आणि देशाच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क किती महत्त्वाचा आहे याची जाणीव करून दिली. आपल्या मनोगतात देशातल्या पहिल्या निवडणुकीपासून आजवरच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचाहि त्यांनी आढावा घेतला. महिला मतदार कमी प्रमाणात आपला हक्क बजावतात अशी खंतही व्यक्त केली. तर अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. व्ही. एस. श्रीवास्तव यांनी शासनाने आमच्या महाविद्यालयाला राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्याची संधी दिली त्या बद्दल आभार मानून जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवकांनी या अभियानात सामील होऊन जनजागृती करावी असे आवाहन केले .
महाविद्यालयातील नोडल ऑफिसर आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले तर रासेयो सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनेश देवरे यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. जे .रघुवंशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन .जे. सोमानी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते .सुरुवातीला राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निवडणूक आयोगाकडून आलेल्या प्रतिज्ञा चे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉ.माधव कदम यांनी वाचन केले. सर्वांनी मतदार जनजागृती अभियानाची प्रतिज्ञा घेतली.










