नंदूरबार l प्रतिनिधी
उत्तर भारतातील तीव्र थंडीची लाट आणि बर्फवृष्टीचा परिणाम जिल्ह्यातही जाणवू लागला आहे. सर्वत्र किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि मागील तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात आज दि. १० जानेवारी रोजी निच्चांकी ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील दाब आणि वालंबा गावात अचानक तापमान घटल्यामुळे थोड्या प्रमाणात हिमवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तीन ते चार दिवस थंडीची तीव्रता असेल आणि हवामान कोरडे राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे अशी माहिती कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांनी थंडीची लाटेपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना हलके पाणी द्यावे जेणेकरून शेताचे तापमान नियंत्रित राहील व पिकांचे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. शक्य असल्यास तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. साधारणपणे केळी व पपई या फळबागांच्या पिकासाठी कडाक्याच्या थंडीचा विपरीत परिणाम होऊन, नुकसान होण्याची शक्यता असते. केळी पपईच्या फळांना संरक्षणासाठी प्लास्टिक बॅगचे आवरण लावावे. बागेच्या भोवती सजीव कुंपण लावून, थंड वार्यापासून बागेचे संरक्षण करावे. बागेमध्ये शक्यतो रात्री किंवा पहाटेच्या वेळी पाणी द्यावे ज्यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होते. झाडांच्या आळ्यात व खड्ड्यात जवळ वाळलेला पालापाचोळा टाकावा. उसाचे पाचट किंवा गव्हाचा भुसा यांचा उपयोग करावा. त्यामुळे थंड तापमानाचा झाडाच्या मुळावर परिणाम होत नाही. तसेच अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी हिमवृष्टीपासून पिकांना वाचवण्यासाठी पिके प्लॅस्टिकच्या चादरींनी झाकून ठेवावीत, असे केल्याने प्लॅस्टिकच्याआतील तापमान वाढते, त्यामुळे तापमान गोठणबिंदूपर्यंत पोहोचत नाही पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होते. थंड वाऱ्यापासून जनावरांचे, कोंबड्यांचे संरक्षण करावे. शेडमध्ये तापमान वाढवण्यासाठी बल्ब लावावेत आणि शेडला पडदे लावावेत. जनावरांना उर्जा व प्रथिनेयुक्त पशु आहाराचा समावेश करून आहार वाढवावा असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्राने केले आहे.