तळोदा l प्रतिनिधी
रोगराई पासून भावी पिढीला दूर ठेवायचे असेल शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीची कास धरण्याचे प्रतिपादन स्वामी समर्थ केंद्राचे दिंडोरी दरबाराचे कृषी विभागाचे प्रमुख गणेश आबासाहेब मोरे यांनी केले.तळोदा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात शनिवारी सायंकाळी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यावेळी केंद्राचे प्रमुख मनोज जावरे,तालुका प्रतिनिधी चेतन इंगळे,स्वयंरोजगाराचे प्रमुख महेश मगरे यांनी त्यांना ट्रॅक्टरची प्रतिमा देवून स्वागत केले.त्यांनी महिला व पुरुष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,सद्या शेतकरी रासायनिक खतांच्या मोठ्या प्रमाणात वापर करून शेतीची पोत बिघडवत आहेत.शिवाय रोगराईचा देखील प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे.एक प्रकारे आपण विषयुक्त शेती कसत आहोत.अशा विषमुक्त शेती पासून भावी पीढी चांगली,सदृढ ठेवायची असेल तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली पाहिजे.असे सांगून त्यांनी जीवनात पर्यावरणाचे तितकेच महत्त्व आहे. हल्ली पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.त्यामुळे ऋतू चक्र देखील बदलत आहे.त्यामुळे असा अवकाळीचा सामना करावा लागत असतो.शेतकऱ्यांनी बंधावरची झाडे तोडू नये.गायीची पूजा करावी.त्याच बरोबर केंद्रातील स्वयंसेवकांनी स्वामी समर्थ केंद्र चालते,फिरते करावे.जेणे करून लोकांच्या अडी,अडचणी समजून घेता येतील.शिवाय त्या दूर करता येतील असे सांगितले. या कृषी मेळाव्यामध्ये कृषी विषयक बॅनरच्या स्वरूपात मांडणी करून प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात शेतीला आवश्यक असणारी माहिती व तंत्र बॅनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नंतर १८ विभागांची माहिती देण्यात आली. यात याज्ञिकी विभाग, मराठी अस्मिता, प्रश्नोत्तर विभाग, विवाह संस्कार, याज्ञिकी, बालसंस्कार, माहिती व तंत्रज्ञान, पर्यावरण प्रकृती विभाग, पशू व गोवंश, गर्भसंस्कार, जनकल्याण व स्वयंरोजगार इत्यादी प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामस्थ व सेवेकऱ्यांना माहिती देण्यात आली. यावेळी महिलांची ओढ मराठी अस्मितेतील १५ स्टॉलकडे जाणवली. त्यातून त्यांनी परंपरागत सण व उत्सव कसे साजरे करावे या संदर्भातील माहिती जाणून घेतली. मेळाव्यासाठी केंद्रातील सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रास्ताविक माणिक सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे निखीलकुमार तूरखिया,देवमोगरा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतनकुमार पवार,व्यावसायिक प्रसाद सोनार यांच्यासह महिला,पुरुष शेतकरी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








