नंदुरबार l प्रतिनिधी
एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी नंदुरबार आगारातील संपकरी कर्मचार्यांनी आज सर्व धर्म समभावाची भावना जोपासात शहरातील सर्वधर्मिय देवीदेवतांना साकडे घालून लालपरी पुन्हा नव्या जोमाने सुरु व्हावी, अशी प्रार्थना केली.


एस.टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी गेल्या ८ नोव्हेंबरपासून राज्यातील एस.टी. कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. या कालावधीत अनेकवेळा संपकर्यांशी चर्चा झाली आहे, काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र, संपकरी एस.टी.महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे आता एस.टी.महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक कर्मचारी निलंबित झाले आहेत तर अनेक जणांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपकर्यांनी विलीनीकरणासाठी आता देवांनाच साकडे घातले. नंदुरबार येथील एस.टी. आगारातील संपकरी कर्मचार्यांनी आज सर्व धर्म समभावाची भावना जोपासत दंडपाणेश्वर गणपती मंदिरात जावून आरती केली. याहामोगीमातेचे दर्शन घेतले. इमाम बादशाह दर्गावर चादर चढविली. चर्चमध्ये जावून प्रार्थना केली. बुद्ध विहारात जावून एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरणाचे साकडे घातले. तसेच संप यशस्वी होवून लालपरी पुन्हा नव्या जोमाने सुरु होवू दे, अशी प्रार्थना केली.









