अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीच्या याचिकाकर्त्या मिनल पाडवींच्या अनुकंपातत्व नियुक्ती प्रकरणात २ महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याचिकाकर्ती मिनल उत्तम पाडवी, रा. भगदरी, ता. अक्कलकुवा, हिने सन 2018 साली विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे विभाग, धुळे, यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. तरी देखील संबंधित अधिकारी यांनी नियुक्तीच्या संदर्भात कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून याचिकाकर्ती हिने सदर अर्जावर निर्णय घेण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) यांच्या मार्फत रिट दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी सदर प्रकरणात माननीय विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे विभाग, धुळे, यांना नोटीस बजावल्यानंतर सदर प्रतिवादी यांनी पत्रान्वये याचिकाकर्ते हिला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे कळविले होते. तसेच सदर कागदपत्रांची पडताळणी नंतर सदर मंजूर प्रकरण नेमणुकी करिता मध्यवर्ती कार्यालय, मुंबई येथे पाठविण्यात येईल असे कळविले होते. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दि. २८ जून २०२१ च्या आदेशान्वये सदर पत्राच्या संदर्भानुसार प्रकरण निकाली काढण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केले होते. सदर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही सदर अर्जावर कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय न घेण्यात आल्यामुळे याचिकाकर्ते हिने माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली असता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद ( न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. जी. दिघे ) यांनी दि.६ डिसेंबर २०२१ च्या आदेशान्वये दोन महिन्याच्या आत निर्णय घेण्याचे आदेश पारित केले. याचिकाकर्ते तर्फे ॲड. गजेंद्र देवीचंद जैन (भंसाली) यांनी काम पाहिले.










