नंदुरबार l प्रतिनिधी-
गेल्या दोन दिवसात पाऊस व थंडीमुळे प्रशासनातर्फे प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यात जिल्हाभरात सुमारे ६२४ हेक्टर पीकांचे नुकसान झाले असून नंदुरबार तालुक्यात १५४ मेंढ्या व एक गाय अशा १५५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर पाच घरांची पडझड होवून नुकसान झाली आहे.यावर्षी तिसऱ्यांदा अवकाळी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून तो हवालदिल झाला आहे.
जिल्हा प्रशासनाने याबाबत विभागाला प्राथमिक अहवाल पाठवला आहे.त्यानुसार नंदुरबार तालुक्यात ३, तळोदा तालुक्यात १ तर अक्कलकुवा तालुक्यात एक घर कोसळून नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय नंदुरबार तालुक्यात १५५ जनावरांनी थंडी व गारठ्यामुळे प्राण त्यागले आहेत. यामध्ये नळवे खुर्द-करजकुपे शिवारात २३, वडबारे ६८, होळतर्फे रनाळे शिवारात ३१, तलवाडे खुर्द १८ व अखतवाडे येथे एक अशा १९ मेंढ्या तर निंभेल शिवारात १२, रनाळे शिवारात १६ अशा १५४ मेंढ्यांचे प्राण गोठले आहेत. यामुळे मेंढपाळांना मोठा अवकाळीचा फटका बसला आहे. याशिवाय रनाळे शिवारात एका गाईचा देखील मृत्यू झाला.दरम्यान अवकाळी पावसामुळे नवापूर तालुक्यात सर्वाधिक ५०८.८० हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाली असून तळोदा तालुक्यात २.५० हेक्टर, अक्कलकुवा तालुक्यात ३८.३० हेक्टर तर शहादा तालुक्यात ७४.४० हेक्टर अशी जिल्हाभरात एकूण ६२४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कांदा, कापूस, मिरची, सोयाबीन, पपई, केळी, हरभरा, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापसाचे पांढरे सोने पावसामुळे खराब झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या कापसाला समाधानकारक दर मिळत असला तरी अवकाळीमुळे मात्र कापसाच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. त्यातच आता वेचणीला आलेल्या कापसाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अवकाळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने आता पंचनामा करुन तात्काळ भरपाई मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.










