शहादा l प्रतिनिधी
शहादा शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला असून सर्वच मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. सततच्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून वाहतूक पोलीस मात्र नावालाच उरले आहेत. शहरात कुठेही वाहतूक पोलिसांचा वावर दिसत नसून नेमके हे वाहतूक पोलीस दिवसभर कुठे गायब असतात आणि करतात तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहादा शहरात ट्राफिक जाम हा प्रकार आता नित्याचाच होऊ लागला आहे.शहरात अनेक चौकांमध्ये वाहतुकीची होणारी कोंडी दैनंदिन बाब झाली आहे वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीमुळे वाहनधारकांनामध्येच अनेकदा शाब्दिक वाद होण्याचे प्रकार देखील घडत आहेत. मात्र वाहतुकीची कोंडी सोडविणे आणि सुरळीत करणे ही जबाबदारी असलेले वाहतूक पोलीस आज मात्र गायब राहत असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे. शहरात अत्यंत गजबजलेले बस स्टँड परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डायमंड बेकरी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळा चौक व तेथून पालिका कार्यालयाला वळसा घालून खेतिया रोड कडे जाणारा पाण्याच्या टाकी जवळ चौक आहे या सर्व चौकांमध्ये एकेरी मार्गाचा अवलंब होत नसल्याने वाहतुकीची होणारी कोंडी दैनंदिन बाब झाली आहे. या सर्व चौकांमध्ये रहदारीची समस्या उग्ररूप घेऊ लागली आहे.मात्र वाहतुकीचे नियमन करण्याची जबाबदारी असलेले वाहतूक पोलीस या महत्त्वाच्या चौकांमध्ये दिसत नसल्याचे परिस्थिती आहे.शहरात किमान आठ ते दहा वाहतूक पोलीस नेमणुकीला असताना एकही वाहतूक पोलीस या चौकांमध्ये दिसू नये ही आश्चर्याची बाब आहे.अनेकदा या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी किमान अर्धा तास पर्यंत राहत असतानाही वाहतूक पोलीस त्या ठिकाणी दिसत नाहीत पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांचे देखील वाहतूक पोलिसांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते सततच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वाहनधारकांमध्ये वाहन काढण्यावरून शाब्दिक वाद देखील उद्भवत आहेत. भविष्यात असे वाद वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतुकीच्या कोंडीमुळे पायी चालणार यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकेरी मार्गाचा अवलंब तर दूरच राहिला आहे. वाहतूक पोलिसाकडून एकेरी मार्गाचा अवलंब करण्यासाठी वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज असताना वाहतूक पोलिसच गायब राहत आहेत या वाहतूक पोलिसांना शहरात विविध चौकांमध्ये नेमणूक दिली असताना नेमके ट्राफिक जाम होतेवेळी कुठे गायब होतात आणि नेमके काय करतात असा प्रश्न सध्या नागरिकांना भेडसावत आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन वाहतूक व्यवस्थेचे नियमन कसे सुरळीत होईल यासाठी वाहतूक पोलिसांना कठोर समज देण्याची मागणी होत आहे.










