शहादा l प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या शहादा -शिरपूर व शहादा दोंडाईचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी संघर्ष समिती, विविध गावातील ग्रामस्थ ,सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांच्या तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्याचा होणारा त्रास मांडत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.कार्यालयात लोकसंसदही भरली. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन अभिजीत पाटील यांना दिल्याने जनआंदोलन मागे घेण्यात आले.
शहादा-शिरपूर व शहादा-दोंडाईचा रस्त्याची पूर्ण वाताहत झाली आहे. रस्त्यावर गुडघ्या एवढे खड्डे झाले आहेत. संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे. वाहनधारक तसेच शेतकऱ्यांच्या जीवावर हा रस्ता उठला आहे. शेतकऱ्यांच्या शेतमाल पक्व झाला असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहतुकीसाठी वाहतूकदार धजावत नसल्याने शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान होत आहे. संबंधित विभागाला जाग यावी यासाठी शेतकरी संघर्ष समिती, परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आज दि.१६ रोजी सकाळी ११ वाजता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अभिजित पाटील,
आर. आर. बोरसे, भगवान पाटील, कांतीलाल टाटीया, बाबा पाटील, वाहन चालक मालक संघटना, विनोद बाफना,नाना निकुंभ,यशवंत चौधरी, संतोष वाल्हे, अनिल भामरे, संजय पाटील,अनिल कुवर,तुषार गोसावी आदींसह शेतकरी बांधव विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर प्रशासनातर्फे प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. जे. वळवी, शाखा अभियंता एस.वाय पगारे, राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता भालचंद्र बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी अडचण, दैनंदिन अपघात,शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान याबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले अधिकारी मात्र अनुत्तरीत झाले होते. प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त केला होता.
शेतकरी हितासाठी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यालयात आंदोलन करुन लोकसंसद भरवण्यात आली.यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते,शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय महामार्ग धुळे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी रस्ता दुरुस्ती बाबत लेखी निवेदन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अभिजित पाटील (शेतकरी संघर्ष समिती)