नंदुरबार | प्रतिनिधी
भारतीय परंपरेनुसार तुलसी विवाहानंतर विवाहांना प्रारंभ केला जातो. परंपरेला धरून रितीरिवाजानुसार लग्न समारंभ रूढी-परंपरा मानत १९ नोव्हेंबरपासून म्हणजे तुलसीविवाहानंतर विवाह समारंभास सुरुवात होणार आहे.नोव्हेंबर ते जुलैपर्यंत ६३ विवाहमुहूर्त आहेत. पावणेदोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली अनेक विवाह घरघुती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडले. यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे खर्चिक होणार असून अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून लग्न समारंभासाठी खर्च करण्याची तयारी केली आहे.
तुलसी विवाहानंतर खर्या अर्थाने विवाहसोहळे सुरू झाल्याने मंडपवाले, बँड पथके, मंगलकार्यालये, फूले, हार, गुच्छ विक्रेते, प्रिंटिंग प्रेस यांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार असून कापड बाजार फुलणार आहे. शेकडो तरुणांचा रोजीरोटीचा प्रश्न सुटणार असून आर्थिक उलाढाल वाढणार आहे.
यंदाचे लग्नाचे मुहूर्त
नोव्हेंबर २०२१- २०, २१, २९, ३०, डिसेंबर-१, ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९. जानेवारी २०२२-२०, २२, २३, २७, २९, फेब्रुवारी-५, ६, ७, १०, १७, १९, मार्च– २५,२६, २७, २८, एप्रिल-१५, १७, १९, २१, २४, २५, मे-४, १०, १३, १४, १८, २०, २१, २२,२५, २६, २७, जून-१, ६,८,११,१३, १४, १५, १६, १८, २२,जुलै-३,५,६,७,८,९.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये चार, डिसेंबरमध्ये ११, जानेवारीत पाच, फेब्रुवारीत सहा, मार्चमध्ये चार,एप्रिलमध्ये सहा, मेमध्ये ११, जूनमध्ये दहा व जुलैत सहा विवाह मुहूर्त आहेत.यंदा नोव्हेंबर व मार्चमध्ये सर्वांत कमी चार विवाह तिथी आहेत.
तुलसी विवाहानंतर २० नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्यांना सुरुवात होत आहे. यावर्षी ६३ मुहूर्त आहेत. मोठ्या प्रमाणात तारखा असल्याने वधू वर पित्यांना वधू-वर पसंतीसाठी अवधी मिळणार आहे. मार्च महिन्यात कमी तारखा असल्या तरी इतर महिन्यात मोठ्या प्रमाणात तारखा आहेत.