नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढविण्यात आलेली फी तात्काळ कमी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली. याबाबत त्यांनी सभेत निवेदनही दिले. वाढीव शुल्क कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
पूर्वी जलतरण तलावाची वार्षिक फी 5,000 रुपये होती. मात्र, ती वाढवून 20,000 रुपये करण्यात आली आहे. तसेच दररोजचे शुल्क 50 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आले आहे. ही शुल्कवाढ अन्यायकारक असून, ती तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी चौधरी यांनी केली.
नंदुरबारमधील आदिवासी मुलांना राज्यस्तरीय जलतरण स्पर्धांमध्ये सहभागी होता यावे, या उद्देशाने जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, अवाजवी शुल्कवाढीमुळे या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिक महानगरपालिकेच्या जलतरण तलावाची वार्षिक फी 6,815 रुपये असताना नंदुरबारमध्ये 20,000 रुपये शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय पालकांना जलतरण तलावात जाण्यासाठी बागेतून प्रवेश घ्यावा लागतो आणि त्यासाठी स्वतंत्र 10 रुपये शुल्क आकारले जाते. यामुळे पालक आणि ठेकेदार यांच्यात दररोज वाद होत असल्याचेही चौधरी यांनी सभेत निदर्शनास आणून दिले.
ठेकेदाराने शुल्कवाढ करताना प्रशासनाची परवानगी घेतली होती का? हा विषय कोणत्या सभेत मांडण्यात आला होता? तसेच नगरपालिकेच्या ठराव क्रमांक 7 ची माहिती आम्हाला देण्यात आली नाही, त्यामुळे या ठरावाला आमचा विरोध कायम आहे, असेही हिरालाल चौधरी यांनी सांगितले.
जलतरण तलावाचा विषय पुढील सर्वसाधारण सभेत आयत्या वेळेस घेण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी दिल्याचे चौधरी यांनी सांगितले.
यावेळी गटनेते आनंद माळी,नगरसेवक पंकज चौधरी,रेखा चौधरी,शोभा चौधरी,सारिका माळी नीता मराठे, सुष्मा गावीत,लक्ष्मण माळी, प्रकाश भोई, आकाश चौधरी, संतोष वसईकर, विक्की मराठे, दीपक चौधरी आदी उपस्थित होते.









