नंदुरबार l प्रतिनिधी
गॅस भरून वाहतूक करणाऱ्या ५० रिक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्याकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रघुवंशी यांनी तात्काळ आरटीओ कार्यालय गाठत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि चालकांना दिलासा देण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध गॅस वापरणाऱ्या रिक्षांविरुद्ध धडक मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत सुमारे ५० रिक्षा जप्त करण्यात आल्या. हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांवर या कारवाईमुळे उपासमारीची वेळ आल्याने परिवहन कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
*रोजगाराचा प्रश्न आणि माणुसकीची साद*
रिक्षा चालकांच्या भावना ऐकून घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव व इतर निरीक्षकांसोबत बैठक घेतली. “जिल्ह्यात मोठे उद्योग नसल्याने अनेक तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा कडक कारवाईमुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून दंड कमी करून रिक्षा सोडण्यात याव्यात,” अशी भूमिका रघुवंशी यांनी मांडली.
*कायद्याचे पालन करण्याचे आवाहन*
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी रिक्षा चालकांनाही मोलाचा सल्ला दिला. “गॅस भरून रिक्षा चालवणे कायद्याने गुन्हा असून, यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. स्वतःच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरटीओच्या नियमांचे पालन करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.या शिष्टमंडळात नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक पप्पू गिरासे, रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी किरण गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते.
रिक्षा चालकांवर आकसापोटी कारवाई नको; मंत्री प्रताप सरनाईक
उपप्रादेशिक परिवहन विभागाने आकसभावनेतून रिक्षा चालकांवर कारवाई करू नये असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.
नंदुरबार शहरात रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे कैफियत मांडली. त्यानंतर आ.रघुवंशींनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेत रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईची माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी देखील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना रिक्षा चालकांवर कुठल्याही आकसापोटी कारवाई न करण्याच्या सूचना केल्या.







