नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर पोलीस दल व प्रादेशिक परिवहन विभागामार्फत सुरू असलेली कडक कारवाई योग्य व कौतुकास्पद असल्याचे मत शिवसेना (उबाठा) तर्फे व्यक्त करण्यात आले. मात्र, सक्तीच्या कारवाईपेक्षा जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देत दंडाआधी हेल्मेट ही भूमिका राबवावी, अशी आगळीवेगळी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
याच मागणीचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणून शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना निवेदन दिले.
अपघातात होणारी प्राणहानी टाळण्यासाठी हेल्मेट वापर अनिवार्य आहे, हे मान्य असले तरी पहिल्याच वेळी दंड न आकारता दुचाकीस्वारांना हेल्मेट खरेदीची संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात शहरातील गांधी पुतळा, सी.बी. पेट्रोल पंप, नेहरू चौक, अंधारे चौक, धुळे चौफुली, नवापूर चौफुली व करण चौफुली या प्रमुख ठिकाणी चांगल्या दर्जाची हेल्मेट ना नफा ना तोटा तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली. तसेच समाजसेवी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी, हातमजूर, गरीब व गरजवंत नागरिकांना मोफत किंवा सवलतीत हेल्मेट देण्याची सक्ती करावी, अशीही मागणी करण्यात आली.
हेल्मेट घेऊनही त्याचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मात्र कठोर कायदेशीर कारवाई व दंड आकारावा, असे स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने अनेकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत प्रथमच पकडल्या गेलेल्या नागरिकांना हेल्मेट घेण्याची एक संधी द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ. हेमंत शर्मा, उपतालुकाप्रमुख बापू महाजन, महेंद्र गिरासे, सुनील पवार, अल्पसंख्याक सेलचे उपजिल्हाप्रमुख इम्तियाज कुरेशी, किसान सेलचे तालुकाप्रमुख निंबा पाटील, उदेसिंग रामसिंग, इम्तियाज खान, जाफर शहा, बबलू नागरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.








