नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने नंदुरबार येथे जिल्हास्तरीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या शिबिरात तृतीयपंथीय नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, घरकूल योजना, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, रेशन कार्ड, स्वयंरोजगारासाठीच्या योजना, बचतगटांना आर्थिक सहाय्य अशा विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली तसेच प्रत्यक्ष लाभ प्रक्रियाही राबवण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त ( समाज कल्याण) सुंदरसिंग वसावे, समाजकल्याण निरीक्षक विवेक चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, तहसीलदार मिलींद कुलथे, निवासी वैद्यकीय अधिकारी सौ. सुलोचना बागुल यांच्यासह सीवायडीए पुणे, विघ्नहर्ता संस्था, नवनिर्माण संस्था, नवचैतन्य संस्था तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी सांगितले की, “राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी 2024 मध्ये धोरण जाहीर केले असून, केंद्र सरकारच्या ‘तृतीयपंथीयांचे हक्क संरक्षण आणि कल्याण अधिनियम’ची अंमलबजावणीही राज्यात सुरु आहे. जिल्ह्यातील जे तृतीयपंथी नागरिक आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशन कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांपासून वंचित आहेत, त्यांना याच शिबिरात ही सेवा पुरवण्यात येईल. त्याचबरोबर वैद्यकीय तपासणी व स्कील मॅपिंग करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येतील.”
तृतीयपंथीयांना केवळ कागदोपत्री लाभ न देता बचतगट, स्वयंरोजगार व शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचे दृष्टीकोन ठेवून पुढील दहा वर्षांचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या एकदिवसीय शिबिरात एकूण १०४ तृतीयपंथी नागरिकांनी सहभाग नोंदविला, ही माहिती शिबिर आयोजकांनी दिली.