नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्रकाशा येथे एका अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह जिल्हा प्रशासनाने कारवाई करत थांबवला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
24 मे, 2025 रोजी प्रकाशा येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाइन 1098 यावर प्राप्त झाल्याने तात्काळ संयुक्त पथकाने कारवाई करत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला व विवाह रोखण्यात यश मिळवले.
पथकाने प्रकाशा येथील ग्रामसेवक बी. जी. पाटील यांच्या उपस्थितीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे बाल संरक्षण अधिकारी गौतम वाघ आणि चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी बाळकृष्ण निकुंभे यांनी मुलीच्या पालकांचे समुपदेशन केले. यावेळी त्यांना बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 ची माहिती देण्यात आली. तसेच, बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम आणि कायद्यातील तरतुदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण नसल्यास तो विवाह बालविवाह ठरतो. बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि असे विवाह आयोजित करणारे, त्यात सहभागी होणारे आणि प्रोत्साहन देणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. दोषी आढळल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 01 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
आपल्या आजूबाजूला कोठेही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. वळवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.