नंदुरबार । प्रतिनिधी
गेल्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले आहे; त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्तित जास्त हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.
ते आज नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के.ठाकरे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्या समोर येईल. हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रीमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे जास्तित जास्त मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
ते पुढे बोलताना म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ, गारपिट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे आज (७ एप्रिल २०२५) नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी त्यांना शासनाकडून दिलासा देण्याबाबात आश्वस्त केले.