नंदुरबार l प्रतिनिधी-
कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून बँड बँजो तसेच डीजे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. राज्य शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन बँड व्यवसायिकांना लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमात वाद्य वाजविण्यास मुभा दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे नंदुरबार जिल्हा बँड व डीजे व्यवसायिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
याबाबत नंदुरबार जिल्हा बँड असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल पवार, उपाध्यक्ष अमित डामरे, सचिव सागर सोनवणे, तालुकाध्यक्ष प्रमेश वसावे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,गेली 17 ते 18 महिने कोरोना महामारीमुळे समाजातील शुभ कार्य, सांस्कृतीक कार्यक्रम त्यावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांवर शासनस्तरावरून बंधन आलेले होते.समाजातील सर्व भागात सद्यस्थितीला कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने मंदिरे, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक कार्यक्रम, व इतर सामाजिक कार्यक्रमांना कोरोनाच्या नियमाच्या अधीन राहून शिथिलता दिली. त्यामध्ये समाजातील कोणतेही शुभ कार्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम बॅन्ड बेंजोच्या सादरीकरणाचा शिवाय पूर्णत्वाला येत नाही.असा सामाजिक संकेत असताना व त्यावर हजारो कलाकार कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतात. अशा कलाकारांची गेले अठरा महिने वाईट स्थितीत गेली. त्यामध्ये त्यांना कौटुंबिक अस्थिरतेला सामोरे जावे लागले ते जात असताना उत्पन्नाचे कसलेही साधन नसताना त्यांना कुटुंब कसे जगवावे अशा परिस्थितीमधून जावे लागले. त्यासाठी जवळची पुंजी संपल्यावरती काही लोकांना वाद्य विकावी लागली . त्यातून हा व्यवसाय बंद पडलेला. त्यामुळे त्यांचे जगणे अवघड झाले होते. राज्य संघटना सातत्याने शासनस्तरावरून हा व्यवसाय सुरू होण्यासाठी पाठपुरावा करत होते .त्यातूनच सध्याच्या महाराष्ट्र शासनाने दि. 22 ऑक्टोबर पासून संस्कृतिक कार्यक्रमांना म्हणजेच बंदिस्त व मोकळ्या जागेवरील कार्यक्रमाला परवानगी दिली. त्याच्यामुळे बँड बँजो आणि डीजे कलाकारांना नोव्हेंबरपासून बँड- बेंजो वाजवण्यास परवानगी मिळालेली आहे. त्या पद्धतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी व सांस्कृतिक मंत्रालय मुंबई यांनी तसे परिपत्रक जारी केलेले आहे. आता इथून पुढे प्रत्येक बँड बँजो कलाकारांना शुभ कार्यामध्ये वाद्य वाजविणे सुलभ झाले आहे. त्यांनीसुद्धा ते सर्व करत असताना कोरोनाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी बँड बँजो चालक कलाकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोकराव जाधव व सरचिटणीस सचिन ढावरे यांनी शासन निर्णयाचे स्वागत करून आभार मानले. कलाकार लोकांनी बँड सादरीकरण करताना कोरोनाच्या नियमाचे योग्यरीत्या पालन करून आपला व्यवसाय करावा. जेणेकरून सामाजिक स्थैर्य व शांतता याचा भंग होता कामा नये याबाबत योग्य दक्षता सर्वांनी घ्यावी. व्यवसायिकांना यापूर्वीच्या जीआर प्रमाणे मंगल कार्यालय यांच्यावरती असणाऱ्या बंधनामुळे मंगल कार्यालयाचे मालक बँड पथकाना संख्येच्या प्रमाणात नाकारत होते. त्या साठी संघटनेने मंगल कार्यालय असोसिएशनच्या अध्यक्षांच्या बरोबर मीटिंग करून सदर अडचणीबाबत चर्चा केली असता.मंगल कार्यालय अध्यक्षांनी बँड कलाकारांची अडचण समजून घेऊन त्यांनी सांगितले की आताच्या नवीन शासन निर्णयाप्रमाणे बँड बॅन्जो पथकांना कार्यालयासमोर वाजवण्यास कसलीच अडचण येणार नाही. असे राज्य संघटनेने कळविले आहे.








