नंदुरबार l प्रतिनिधी-
अपघात होवू नये यासाठी चांगल्या रस्त्यांसोबत उपाययोजना करणे हे शासकीय यंत्रणेचे काम आहे, नागरीकांनी देखील याला रस्ता सुरक्षेची मानके पाळून प्रतिसाद देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी केले आहे.
नंदुरबार शहरातील अटलबिहारी वाजपेयी सभागृहात 36 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाला आज सुरवात झाली. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. मित्ताली सेठी म्हणाल्या, वाहन धारकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट सक्तीबाबत व्यापक जनजागृती हाती घेतली असून, अपघातांच्या अनुषंगाने 132 ब्लॅक आणि असुरक्षित स्थळे शोधण्यात आले आहेत, या स्थळांवर अपघात रोखण्यासाठी रिफ्लेक्टर आणि अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी देखील येत्या 21 तारखेपर्यंत केली जाणार असून 14 तारखेपर्यंत याच अनुषंगाने सर्व यंत्रणांचा आढावा घेणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यावेळी म्हणाल्या.
येणाऱ्या काळात वाहुतकीच्या नियमनासाठी चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा मंजुर करण्यात आली असून नागरीकांनी रस्ते सुरक्षेच्या अंमलबजावणीसाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त यांनी व्यक्त केली.
दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकी गाडीत सिटबेल्टचा वापर करणे, वेगावर नियंत्रण ठेवणे, तसेच वाहन चालवताना मद्यपान टाळणे या चतु:सुत्रांच्या अवंलब केल्यास रस्ते अपघातांची संख्या कमी होवून रस्ता सुरक्षा अभियानास मदत होईल, असा विश्वास आजच्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केला. कोरोना कार्यकाळात झालेला लोकांच्या मृत्युसंख्येपेक्षाही वर्षाकाठी रस्ता अपघातात मृत पावणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने साऱ्याच मान्यवरांनी याबाबत चिंता व्यक्त करत रस्ता सुरक्षा उपायांबाबत मंथन केले.
कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि नागरीकांना सुरेक्षेसाठी शपथही देण्यात आली. महिनाभर हे रस्ता सुरक्षा अभियान सुरु राहणार असल्याचे देखील यावेळी परिवहन विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल नलावडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.