नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जल्लोष लोककलेचा अंतर्गत आज दि.७ ऑक्टोबर सोमवार रोजी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकलाकारांमध्ये लोककलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि मुलांमध्ये लोककलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा तथा सिनेअभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांच्याशी संकल्पनेतून सदर महोत्सव महाराष्ट्रभर होत आहे.
दि.०७ ऑक्टोबर २०२४ रोजी सोमवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे सकाळी १० वाजेपासून महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील सुमारे ३५० विद्यार्थी व ३० शाळा व संस्था यांनी सहभाग नोंदविला आहे. या लोककला महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, एकल नृत्य, एकल गीत, एकल गायन यांचे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवात ६ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलावंतांनी सहभाग नोंदविला आहे. विजेत्या बालकलावंतांना सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, उत्तम व प्रशंसनीय असे ७५ हजारांची बक्षिसे दिली जाणार आहे. तसेच सर्व सहभागी बाल कलावंतांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या लोककला महोत्सवाचे उद्घाटन जेष्ठ लोककलावंत तथा सोंगाड्याकार रायसिंगदादा हिरा पाडवी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने करण्यात येणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) वंदना वळवी, नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.) प्रविण अहिरे, नंदुरबार जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) उर्मिला पारधे, पत्रकार तथा साहित्यिक रमाकांत पाटील, नंदुरबार जिल्हा उपशिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ.युनूस पठाण, नंदुरबार जिल्हा उपशिक्षणाधिकारी (योजना) भावेश सोनवणे आदींची उपस्थिती राहणार आहे.
लोककला महोत्सवाचे पारितोषिक वितरण सायंकाळी ६ वाजता बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईचे कार्याध्यक्ष तथा बालनाट्य निर्माता राजीव तुलालवार व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईचे कार्यकारी सदस्य तथा नंदुरबार जिल्हा शाखेचे प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर व बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी दिली आहे.
या लोककला महोत्सवासाठी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन अध्यक्ष राजेश जाधव, उपाध्यक्ष मनोज सोनार, प्रमुख कार्यवाह नागसेन पेंढारकर, कोषाध्यक्ष राहुल खेडकर, कार्यकारी सदस्य गिरीश वसावे, हरीश हराळे, काशिनाथ सूर्यवंशी, कुणाल वसईकर, रोहित हराळे, पार्थ जाधव आदींनी केले आहे.