शहादा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून शहादा शहरातील नियमित वीज ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठवून अव्वाच्या सव्वा वीज बिल वसूल केले जात आहे.मीटर सुरू असूनही ग्राहकांना सरासरी बील पाठवून मनस्ताप देणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या विरोधात वीज ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वीज वितरण कंपनीच्या वतीने जानेवारी महिन्यापासून अत्याधुनिक वीज मीटर बसविण्यासोबत नवीन तंत्रज्ञानाने प्रत्यक्ष रिडिंग न घेता डिजिटल विज बिल ग्राहकांना दिले जात असल्याचे सांगितले जात आहे. गत तीन-चार महिन्यापासून नियमित वीज ग्राहकांना प्रत्यक्ष रिडिंग न घेता वीज वितरण कंपनीकडून विज बिल वितरित केले जात आहे.
सदर वीज बिल सरासरी दिले जात असून वीज रीडिंग उपलब्ध नाही असे वीज बिलावर नमूद करण्यात येत आहे. यामुळे नियमित वीज ग्राहकांना मीटर रिडींग प्रमाणे वीज बिल न येता सरासरी विज बिल पाठवले जात आहे.मीटर सुरू असूनही सरासरी वीज बिल येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप होत आहे.
मीटर सुरू असतांना रिडिंग उपलब्ध नसल्याचे बील येत असल्याने तक्रार दाखल करण्यासाठी दररोज वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या शहादा शहर कार्यालयात दाखल होत आहेत. मात्र संबंधित कर्मचारी,कनिष्ठ अभियंता, अधिकारी वीज ग्राहकांच्या तक्रारीची दखल न घेता थातूर-मातूर उत्तरे देत आहेत.
प्रकाशा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील संबंधित कर्मचारी व अधिकारी वीज ग्राहकांची बोळवण करत आहेत.यापुढील विज बिल व्यवस्थित येईल, तुमचे रीडिंग घेत असतांना लाईट नसेल किंवा मीटर बंद असेल असे उत्तर देऊन ग्राहकांना परत पाठवत आहेत.तसेच वीज बील मुदतीत न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असेही सांगितले जात आहे.परिणामी ग्राहकांना मनस्ताप होत असून वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ग्राहक वैतागले आहेत. वीज वितरण कंपनीने आपल्या कारभारात लवकर सुधारणा केली नाही तर वीज वितरण कंपनीवर मोर्चा काढण्यात येऊन संबंधित अभियंता व अधिकारी-कर्मचारी यांना जाब विचारला जाईल अशी प्रतिक्रिया संतप्त ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
“वीज वितरण कंपनीने आपल्या कारभारात त्वरित सुधारणा करून वीज ग्राहकांना योग्य बिल द्यावे अशी मागणी ग्राहकांच्या वतीने करत आहे.शहादा शहरातील अनेक वीज ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून रिडिंग उपलब्ध नाही असे लिहून सरासरी वीज बिल दिले जात आहे. यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून ग्राहकांना योग्य बिल न दिल्यास वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून जाब विचारला जाईल.”
अरविंद कुवर,
रिपाई (आठवले)जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष,शहादा.
“वीज वितरण कंपनीच्या वतीने अत्याधुनिक व डिजिटल वीज मीटरच्या नावाखाली विविध करांची आकारणी केली जात आहे.सध्या सुरक्षा अनामत या नावे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिकची रक्कम वीज बिलात आकारली जात आहे.व्यावसायिक वापर करणाऱ्या ग्राहकांनाही छुपे कर आकारणी केली जात आहे.मीटरभाडे, स्थिर आकार,इंधन आकार, सुरक्षा अनामत या नावाने वीज वितरण कंपनी भरमसाठ बील पाठवत आहे.कंपनी आपल्या कारभारात सुधारणा करत नसल्याने ग्राहकांत असंतोष निर्माण झाला आहे.असंतोषाचा उद्रेक झाल्यास त्याची जबाबदारी वीज वितरण कंपनीच्या स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची राहील.”
अनिल भामरे,
माजी उपसरपंच, मंदाणे ता. शहादा