नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामात मोठया प्रमाणावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते. बीटी कापसाच्या परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशिल असणारे बोगस बियाणे अनेक अनधिकृत कंपन्यामार्फत उत्पादित करून शेतकऱ्यांना अवैधरित्या छुप्या पद्धतीने विक्री केले जाते. मात्र या बियाण्यामुळे निसर्गाला व जमिनीला हानी पोहचते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या बियाण्याचा वापर करू नये. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी. राकेश वाणी यांनी केले आहे.
एटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपिकता व मानवी शरीरावर होणारे परिणााम लक्षात घेता येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करू नये. तसेच अशा प्रकारचे कापूस बियाणे विक्री करत असतांना आढळून आल्यास संबंधितावर बियाणे कायदा 1966, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा 2009, बियाणे नियंत्रण आदेश 1983, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे विक्री होत असल्याचे निर्देशनास आल्यास कृषि विभागाच्या जिल्हा नियंत्रण कक्षास किंवा तालुका नियंत्रण कक्षास कळवावे.
जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्त्तरावर 6 असे एकूण 7 भरारी पथकांची व 7 नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच भरारी पथकाने वेळोवेळी कृषि निविष्ठा विक्री केंद्राना भेटी देवून तपासणी करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर वेळीच योग्य ती कारवाई करावी नेमलेल्या भरारी पथकाने रासायनिक खते व किटकनाशके बाबत उगमप्रमाणपत्र तपासणी, मुदतबाह्य निविष्ठाची रोखणे तसेच पॉस मशीनवरील खताचा ताळमेळ व त्रुटी आढळल्यास अनधिकृत बियाणे साठयाचा शोध घेवून जप्तीची कार्यवाही करावी असे श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*एच.टी.बी.टी बियाण्यामुळे होणारे नुकसान*
अत्यंत कमी उगवण क्षमता.
कमी उत्पादन.
बियाणे बोगस निघाल्यास खरेदी पावत्या नसल्यामुळे नुकसानीची हमी नाही.
तणनाशक अतिवापरामुळे उत्पादन खर्चात वाढ.
जमिनीची सुपिकता कमी होते.
अत्यंत महत्वाचा मानवी शरीरावर कर्करोग सारख्या आजारास आमंत्रण देते
*बोगस बियाणे कसे ओळखाल*
शासनाचा परवाना व बियाणे प्रमाणीत नसणे.
बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान व कोणत्या क्षेत्रासाठी वापर करावा याचा उल्लेख नसतो.
पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.
*बियाणे खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी*
बियाणे अधिकृत परवानाधारक यांच्याकडून खरेदी करावे, न चुकता पक्के बिल घ्यावे.
बिलात पिक, वाण, लॅाट क्रमांक, वजन, अंतिम मुदत कंपनीचे नमुद करावे
खरेदी केलेल्या बियाणाचे वेष्टन/ पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थेडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे
भेसळीची शंका दुर करण्यासाठी बियाणेची पाकिट सिलबंद/ मोहारबंद असल्याची खात्री करावी.
बियाण्याच्या व किटकनाशकांची अंतिम मुदत तपासुन घ्यावी
छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा