नंदुरबार l प्रतिनिधी
स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी ते राहुल गांधी यांचा धुळे नंदूरबार एकत्रित असल्यापासून नवापुरच्या नाईक कुटुंबाशी घरोबाचा संबंध आहे. जिल्हा ते राज्यातील घडामोडींबाबत राजकीय निर्णय नवापूर तालुक्यातून होत असत आता परिस्थीत बदलली असून सत्ता केंद्रे बदलली असली तरी जिल्ह्यातील 5 कुटुंबाभोवतीच राजकारण फिरत आहे.
स्वातंत्र्यानंतर पंडीत नेहरू यांच्या नेतृत्वात 1952 साली लोकसभेची निवडणूक झाली.त्यात नंदूरबार तालुक्यातील नटावद येथील जयंत गणपत नटावदकर निवडून आले.त्यांच्या नंतर त्यांचा वारसा पुत्र डॉ.सुहास नटावदकर यांनी चालवला.ते 2004 व 2009 साली भाजपातर्फे तर 2014 साली अपक्ष लोकसभेची निवडणूक लढवली यात पराभव झाला.डॉ.सुहास नटावदकर यांची पत्नी सुहासिनी नटावदकर यांनीही आमदारकीची निवडणूक लढवली त्याही पराभूत झाल्या सध्या हे कुटुंब अलिप्त आहे.
याच दरम्यान धुळे नंदूरबार जिल्हा संयुक्तिक असताना नवापूर तालुक्यातील नवागाव येथील सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.सरपंच प. स.सभापती, जि.प.सदस्य बनत त्यांनी आमदारकी लढवली त्यानंतर काँग्रेसने खासदारकी लढवली त्यातही ते विजयी झाले.त्यानंतर त्यांनी पुन्हा आमदारकी लढवली व जिंकली त्यांनी सतत नवापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.मात्र 2009 साली मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचे बंधू शरद गावीत यांनी त्यांचा पराभव केला.त्यांच्या परिवारात सध्या त्यांचे पुत्र शिरीषकुमार नाईक आमदार आहेत.त्यांची सून रजनी शिरीषकुमार नाईक या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व विद्यमान सदस्य आहेत.त्यांचे दोन पुत्र अजित नाईक व मधुकर नाईक हेही जि.प.सदस्य आहेत.तर माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या माजी जि.प.अध्यक्षा सिमा वळवी या सून आहेत.
सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांनी आमदारकी व खासदारकीच्या काळात अनेकदा मंत्री पद निभावले या काळात गांधी कुटुंबाशी घनिष्ट संबंध आला.त्यामुळे स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी ते राहुल गांधी यांचा धुळे नंदूरबार एकत्रित असल्यापासून नवापुरच्या नाईक कुटुंबाशी जवळचा संबंध असल्याने जिल्हा सह राज्यातील महत्वाचे राजकीय निर्णय नवापूर येथे होत असत.
याच दरम्यान त्यांच्या साथीला नवापूर तालुक्यातील धुडीपाडा येथील माणिकराव होडल्या गावित यांचा सरपंच पासून प्रवास सुरू झाला सलग ३० वर्षे खासदार राहिलेले पहिले नेते आहेत. १९८० च्या लोकसभा निवडणुकीपासून ते २००९ पर्यंत ते नंदुरबारचे खासदार राहिले. सलग ९ वेळा लोकसभेवर निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. दहाव्या लोकसभेत 2014 साली त्यांचा पराभव भाजपच्या खा.डॉ.हिना विजयकुमार गावित यांनी केला.माणिकराव गावित यांचा मुलगा भरत गावीत हे नंदूरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सद्या सदस्य आहेत.तर सून जिल्हा परिषदेच्या सभापती आहेत.भरत गावीत यांनी आमदारकी लढवली त्यात त्यांचा पराभव झाला.
सुरूपसिंग नाईक व माणिकराव गावित यांच्या काळात नंदूरबार येथील
माजी आ. बटेसिंग रघुवंशी यांनी अपक्ष निवडणूक लढवीत प. स.मध्ये निवडून येत विधानपरिषदेत आमदार पदी मजल मारली आज त्यांचे पुत्र जि.प.सदस्य, विधानपरिषद आमदार म्हणून चंद्रकांत रघुवंशी निवडून आले आज ते शिंदे गटाचे नेते व डॉ.विजयकुमार गावित यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यांनी अनेकदा नंदुरबारच्या नगराध्यक्ष पद निभावले.मुलगा ऍड.राम रघुवंशी हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य व शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहे.त्यांच्या घरात पुतण्या यश रघुवंशी भाचा किरण रघुवंशी नगरसेवक होते.तर अक्रानी तालुक्यातील असली येथील आ.ॲड.के.सी पाडवी यांनी अक्कलकुवा अक्रानी विधानसभेत 1 वेळी अपक्ष तर 7 वेळी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून गेले.त्यांच्या भगिनी गीता पाडवी या जि.प.सदस्य आहेत तर मुलगा ऍड गोवाल पाडवी 2024 लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे उमेदवारी करीत आहेत.
सुरुपसिंग नाईक, माणिकराव गावित, रघुवंशी, के.सी.पाडवी, पद्माकर वळवी असे अनेक दिग्गजांची फौज नंदुरबार जिल्ह्यात होती त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता याच दरम्यान नंदूरबार तालुक्यातील कृष्णा गुरुजी गावीत यांनी काँग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांविरोधात भूमिका घेत 1990 च्या सुमारास नंदुरबार विधानसभा मतदारसंघातूून जनता दलाच्या तिकिटावर उमेदवारी मिळवत काँग्रेसजनांपुढे आव्हान उभे केले होते. येथूनच ख-या अर्थाने गावित कुटुंबीयांमध्ये राजकारणाची नुसतीच मुहूर्तमेढ नव्हे, तर पुढील काळात डॉ. विजयकुमार गावित यांच्याही राजकीय वाटचालीची पायाभरणी झाली. कारण 1995 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत हा मतदारसंघ जिंकला, तो आजतागायत वरचष्म्याखाली राखण्यात यशस्वी ठरले आहेत.
डॉ.विजकुमार गावीत यांची पूर्वाश्रमीची राजकीय पार्श्वभूमी आहे.त्यांचे काका तुकाराम हिरजी गावीत हे नंदूरबार लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते.त्यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत या माजी गृहमंत्री रमेश पाण्या वळवी यांच्या कन्या आहेत.डॉ.विजयकुमार गावित यांच्या राजकीय पदार्पण नंतर काँग्रेसला घरघर लागली.डॉ.विजयकुमार गावित यांची मुलगी खा.हिना गावीत दोन वेळा खासदार तर लोकसभा 2024 साठी भाजपातर्फे उमेदवार आहेत.त्यांची लहान कन्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत.पत्नी कुमुदिनी गावीत माजी जि.प.अध्यक्षा विद्यमान सदस्य आहेत.भाऊ शरद गावीत माजी आमदार त्यांच्या दोन्ही कन्या जि. प च्या विद्यमान सदस्य आहेत तर लहान भाऊ माजी प. स.सभापती होते.यासह कुटुंबातील अनेक सदस्य विविध पदांवर आहेत.सद्या स्थितील नेते वयोवृध्द झाले आहेत तर काहींचा मृत्यू झाला आहे.तर काहींनी पक्ष बदलला आहे.असे असले तरी 70 वर्षात नंदूरबार जिल्ह्यातील राजकारण सुरुपसिंग नाईक,माणिकराव गावीत,डॉ.विजयकुमार गावीत,
चंद्रकांत रघुवंशी, ॲड.के.सी.पाडवी या पाच कुटुंबा भवती फिरत आहे.