नंदुरबार l प्रतिनिधी
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांचे हस्ते म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत रायखेड पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. या वार्षिक तपासणी दरम्यान विविध उपक्रमांचे व नुतनीकरण झालेल्या वास्तुंचे यावेळी उद्घाटन करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील रायखेड येथे भेट दिली असता, रायखेड येथील पोलीस चौकी अत्यंत जीर्ण झालेली असून ती पडक्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांना रायखेड येथे नवीन पोलीस चौकी उभारणीबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत सांगितले. त्याप्रमाणे म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी रायखेड गावातनवीन पोलीस चौकी उभारणीबाबत कार्यवाही करत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच, रायखेड गावातील प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करुन नवीन पोलीस चौकी बांधणीबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे मांडली त्यांनी देखील त्यावर तात्काळ कारवाई करत नवीन पोलीस चौकी उभारणीसाठी सहमती दिली.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी. जी. शेखर पाटील हे म्हसावद पोलीस ठाणे येथे वार्षिक तपासणीनिमित्त आले असता म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील रायखेड येथे उभारण्यात आलेल्या प्रशस्त अशा नवीन पोलीस चौकीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांचा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांचे शहादा उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, ” नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीसांची असते आणि पोलीसांना नागरिकांच्या सहकार्याची गरज असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून भारताची जास्तीत जास्त लोकसंख्या खेड्यांमध्ये एकवटलेली आहे. पूर्वी खेड्या गावांची अवस्था खूप वाईट होती, परंतु कालांतराने शहरांप्रमाणेच खेड्या गावांचा देखील विकास होत गेला. त्यामुळे खेड्या गावांमध्ये देखील गुन्हेगारी वाढू लागली. समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था राहावी, प्रत्येकाला न्याय मिळावा यासाठी पोलीस दल महत्वाची भूमिका बजावितो. रायखेड ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस दलास रायखेड गावात पोलीस चौकी उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन एक चांगली इमारत उभी केली.
त्यामुळे म्हसावद पोलीसांची जबाबदारी देखील वाढलेली असून पोलीस प्रशासन आता अधिक गतिमानपणे काम करेल ” अशी अपेक्षा व्यक्त करुनरायखेड पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन एक भव्य इमारत उभी करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे रायखेड गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की,” रायखेड पोलीस चौकी अंतर्गत एकूण 17 गावांचा समावेश असून रायखेड हे गाव महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. परिसरातील नागरिक येथे बाजारानिमित्त येत असतात तसेच रायखेड येथून मध्यप्रदेश राज्यात जाणारा महामार्ग असल्यामुळे येथे अवजड वाहनांची देखील वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे काही वेळेस वाहतूकीचा खोळंबा होवून नागरिकांची व वाहन चालकांची गैरसोय होत असते. नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस दलाची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी पोलीसांना सतत तेथे थांबणे आवश्यक असते. नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीमुळे नागरिकांना वेळीच मदत होणार असून नागरिकांना निश्चितच याचा फायदा होणार आहे.
रायखेड पोलीस चौकीची इमारत ज्या ठिकाणी उभी आहे त्याठिकाणी अगोदर घाणिचे साम्राज्य होते, परंतु रायखेड ग्रामस्थ व म्हसावद पोलीसांच्या मेहनतीमुळे आज तेथे सुरक्षेचे मंदिर उभे राहिले आहे “असल्याचे सांगून रायखेड पोलीस चौकीसाठी मोलाचे सहकार्य करणारे रायखेड गावाचे सरपंच श्रीमती उषाबाई ठाकरे, उपसरपंच मुन्ना पाटील, कैलास पाटील माजी सरपंच, प्रतिष्ठीत नागरिक हिरालाल पाटील, मुकेश टाटीया, अशोक जैन, शांतीलाल बाफना व समस्त रायखेड ग्रामस्थांचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले.
रायखेड गावातनवीन पोलीस चौकीचे उद्घाटन झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिलेल्या सूचनांबद्दल म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आभार व्यक्त करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दल भविष्यात देखील अशीच भरीव कामगिरी करुन नागरिकांना तात्काळ मदत करु असे आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बी.जी.शेखर पाटील, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे वाचक पोलीस उप अधीक्षक श्री. ढिकले,स्थानिक गुन्हे शोखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे, रायखेड गावाचे सरपंच श्रीमती उषाबाई ठाकरे, उपसरपंच मुन्ना पाटील, कैलास पाटील माजी सरपंच, प्रतिष्ठीत नागरिक हिरालाल पाटील,मुकेश टाटीया,अशोक जैन, शांतीलाल बाफना यांच्यासह रायखेड गावातील नागरिक व म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.








