नंदुरबार l प्रतिनिधी
हजारो यात्रा आणि त्यानिमित्ताने होणारे महोत्सव देशभर होत असतात, परंतु सारंगखेड्याची यात्रा अन् चेतक महोत्सव हा देशातला आगळावेगळा स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
ते काल सारंगखेडा यात्रेत सुरू असलेल्या चेतक फेस्टीवल मध्ये बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार रावल,, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टीवलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावळ, जि.प.सदस्य अभिजित पाटील दोंडाईचा शहराच्या माजी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उगले शहाद्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार दीपक गिरासे, देवा रावल, कामराज निकम, महावीरसिंह रावलं, देविदास बोरसे,धनंजय मंगळे,प्रभाकर पाटील, महेंद्र गिरासे, निखिल राजपूत आदि उपस्थित होते.

यावेळी पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले, या यात्रेला ४०० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या यात्रेच्या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटक सारंगखेड्यात येतात, अश्व पाहण्याबरोबरच त्यांची खरेदीही करतात. लाखो-करोडो रूपयांची येथे उलाढाल होत असते. या यात्रेचा संपर्क खांदेशवासीयांना अभिमान असल्याचे सांगून ते म्हणाले, अलिकडे अश्व पाळणे आणि बाळगणे हा उंची छंद झाला असून पूर्वी युद्धात घोड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत होता अलिकडे अश्व हे संरक्षण दलात व पोलीस दलात परेडसाठी वापरले जातात.
चेतक महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील :जयकुमार रावल
सारंगखेड्याच्या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि प्राचिन वारसा लाभला असून केवळ अश्व महोत्सवच नाही तर या यात्रेच्या निमित्ताने होणारा पशुंचा बाजार आणि सुक्या मेव्याचा बाजारही वैशिष्ट्यपूर्ण असतो. जुन्या काळात अफगाणिस्थानातूनही येथे अश्व, सुका मेवा विक्री आणि प्रदर्शनासाठी येत असे. चेतक फेस्टीवल च्या रूपाने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला ग्लोबल करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. ही यात्रा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.








