तळोदा l प्रतिनिधी
मागील चार दशकांपासून भाजपाशी एकनिष्ठ असताना आमच्यासारख्या नेत्यांना डावलून चारधाम फिरून येणाऱ्यांना निष्ठावंत म्हणून सन्मानित करण्यात येत असून आम्हाला जिल्ह्यात पक्षातून डावलण्यात येत असल्याचा आरोप भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी यांनी पत्रकार परिषदेत केला.
तळोदा येथे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, तळोदा शहर व तालुक्यात नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणूक लढवण्यासाठी पक्षाला उमेदवार मिळायचे नाहीत. अशा परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व व चिन्ह टिकून राहावे, यासाठी उमेदवाराच्या हातपाय पडून त्याला पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी आम्ही तयार करायचो. वेळप्रसंगी त्याच्या निवडणुकीच्या सर्व खर्चही आम्ही पदरमोड करून केला.
तळागाळात पक्ष पोचवण्यासाठी पराभव डोळ्यासमोर असताना देखील पक्षाच्या चिन्हावर उमेदवारांकडून निवडणूक लढविल्या. पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाची डळमळीत परिस्थिती बघता पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला. आम्ही मात्र एकनिष्ठपणे मागील 40 वर्षापासून पक्षाचे काम करत आलो आहोत. असे असताना तळोदा शहरात भाजपातर्फे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात सत्कार करण्यात आलेल्यापैकी अनेक जणांनी पडत्या काळात पक्षाची साथ सोडून इतर पक्षात प्रवेश केला होता,
अशा लोकांच्या त्या ठिकाणी सन्मानित करण्यात
आले तर आमच्यासारख्या लोकांनी चाळीस वर्ष पक्षाचे साथ सोडली नाही. अशांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले.
मोठ्या संघर्षातून आज जिल्ह्यात भाजपाचे दोन आमदार एक खासदार आहे. पक्षाच्या वाटेला मंत्रिपद, पालकमंत्री पद देखील आले. त्याच्या वापर आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, त्यांच्या गावातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी केला, तर यात आमचे काय चुकले ? खासदार, मंत्र्यांकडून आम्ही कामे करून घेतली तर आम्ही गावित गटाचे, आमदारांकडून कामे करून घेतली की तर आमदार गटाचे, असे लेबल लावणे थांबवले पाहिजे?
पक्षातील काही लोक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकी निर्माण होऊ नये, आपला स्वार्थ साधण्यासाठी जाणीवपूर्वक पक्षात अशी गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे पक्षासाठी विघातक कृत्य आहे.पक्षाच्या घटनेनुसार माजी जिल्हाध्यक्ष हा जिल्हा कार्यकारणीच्या कायम निमंत्रित सदस्य असतो. असे असताना पक्षाची घटना पायदळी तुडवत मी माजी जिल्हाध्यक्ष असताना देखील माझे नाव जिल्हा कार्यकारणी निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात आले नाही.
जाणीवपूर्वक मला जिल्हा कार्यकारणीतून वगळण्यात आले.
मी यापुढे अधिक क्षमतेने पक्ष वाढवण्याचे व पक्ष बांधणीचे काम पूर्ण ताकदीने करणार, शहर तालुका जिल्ह्यातील सर्व जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधून जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे डॉ.शशिकांत वाणी यांनी सांगितले.यावेळी रुपसिंग पाडवी, डॉ स्वप्नील बैसाणे उपस्थित होते.