नंदुरबार । प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपीय उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान नंदुरबार जिल्ह्यातील ६३९ ग्राम पंचायतींमध्ये ९ ते ३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत राबविण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत पातळीपर्यंतचे सुक्ष्म नियोजन करून नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
त्यासाठी ग्रामसभा घेऊन सर्व कृती आराखडा तयार करुन ठराव करुन नियोजन करण्यात आलेले आहे. ९ ते १४ ऑगस्ट २०२३ या दरम्यान कोणत्याही एका दिवशी खालील शिलाफलक लावणे, वसुधरा वंदन, स्वातंत्र सैनिक/विरांना वंदन, पंचप्रण ( शपथ) घेणे, ध्वजारोहण कार्यक्रम असे ०५ उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या संदर्भात केंद्र सरकार च्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब या प्रत्येक उपक्रमाच्या आयोजनात केला जाणार आहे. जि.प. च्या वतीने प्रत्येक कार्यक्रम निहाय आयोजनाचे पुढील प्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे श्री. सावन कुमार यांनी कळविले आहे.
*▶️ शिलाफलक :* जिल्ह्यातील ६३९ गावातील एका संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकाची दिलेल्या डिझाईन प्रमाणे नरेगा मधुन उभारणी करण्यात येणार आहे, शिलाफलकावर आझादी का अमृत महोत्सव लोगो, प्रधानमंत्री यांचा व्हिजन २०४७ संदेश, स्थानिक शहिद विरांची नावे नसल्यास विहीत नमुन्या दिलेला मजकुर, ग्रामपंचायतीचे नाव, दिनांक या बाबी नमुद करण्यात येतील.
*▶️ वसुधरा वंदन:* या मध्ये गावातील योग्य ठिकाण निवडुन नरेगा मधुन वसुधरा वंदन म्हणुन ७५ देशी वृक्षांची लागवड करुन अमृत वाटीका तयार केली जाणार आहे.
*▶️ स्वातंत्र सैनिक/विरांना वंदन:* या उपक्रमांत ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त विरांचा (आर्मी, पोलिस दल) स्वातंत्र सैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रम वेळी सन्मान (शाल, बुके, श्रीफळ) करण्यात येणार आहे.
*▶️ पंचप्रण ( शपथ) घेणे* यात ग्रामपंचायत स्तरावरील सर्व लोकप्रतिनीधी, अधिकारी/कर्मचारी, गावकरी हातात दिवे लावुन शपथ घेतील.
*▶️ ध्वजारोहण कार्यक्रम:* गावक्षेत्रातील (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत ) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवुन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येईल.
संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनीधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी करावा. तसेच या कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायतीच्या हद्दीतील १-२ मुठ माती घेवुन सन्मानपुर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्वयक अधिकारी यांच्याकडे सोपवावी. १५ ऑगस्ट ला दरवर्षी प्रमाणे नियमीत झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल.
*तालुका स्तरावरील नियोजन*
*▶️ मातीचे संकलन :* १६ ते २० ऑगस्ट २०२३ दरम्यान प्रत्येक गावातुन आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव पेंट अथवा रेडीयम ने लिहिले जाईल. हा मातीचा कलश २७ ते ३० ऑगस्ट २०२३ या दरम्यान प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे घेवुन जाण्यासाठी एका युवकाची निवड करण्यात येईल. याकरिता नेहरु युवा केंद्र, युवक कल्याण विभागाचे सहाय्य घेतले जाणार आहे.
*▶️ वसुधावंदन:* यामध्ये तालुक्याचे योग्य ठिकाण निवडुन वसुधा वंदन म्हणुन नरेगा मधुन ७५ देशी वृक्षाच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटीका तयार केली जाईल.
*▶️ ध्वज फडकविणे :* तालुका स्तरावर (अमृत सरोवर शाळा, पंचायत समिती) या एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवुन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे. या संपुर्ण कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनीधी, युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, सर्व नागरिक यांचा सहभाग घेवुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहनही सावन कुमार यांनी केले आहे.
*▶️नोडल अधिकारी:* तालुकास्तरावर गटविकास अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे. या उपक्रमाची गावामध्ये दवंडी, बैठका, सादरीकरण, प्रिंट मिडीया, रेडीओ सोशल मीडिया यांचा प्रभावी उपयोग करून व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात येणार असून,
या अभियानाचे उपक्रम माहिती (फोटो सेल्फी) गटविकास अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या पोर्टलवर अपलोड केले जाणार आहेत. ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता पंचायत समितीस्तरावर व जिल्हापरिषद स्तरायर सर्व कर्मचारी शपथ घेतील.
*▶️अभियानासाठी बक्षिसे:* मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबविणे बाबत नंदुरबार जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस तालुकास्तरावर रु. २५०००/- (अक्षरी रक्कम रु. पंचवीस हजार मात्र पं.स. सेस फंडातून ) व जिल्हास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या एका ग्राम पंचायतीस रु. ५१०००/- (अक्षरी रक्कम रु. एकावन्न हजार मात्र जि.प.सेस फंडातून ) व ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम करणा-या युवक मंडळ, महिला बचत गट, शेतकरी मंडळ, लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या पैकी एकास ग्राम पंचायत आपल्या स्वनिधीतुन रु.५०००/- (अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र) बक्षिस देईल. या प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत व तालुकास्तरावर कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हास्तरावर सभा,व्हीसी द्वारे व लेखी पत्राव्दारे देण्यात आलेल्या आहेत. तसेच अभियानाचे काम जिल्ह्यामध्ये जोमाने सुरु झालेले आहे, यात जिल्ह्यातील जास्तितजास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. सावनकुमार यांनी केले आहे









