नंदूरबार l प्रतिनिधी
पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे समुपदेशन करुन बालविवाह रोखण्यात नवापूर पोलीसांना यश आले आहे.आतापर्यंत 30 बालविवाह रोखण्यात जिल्हा पोलिस दलाला यश आले आहे.
बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून “ऑपरेशन अक्षता” हा उपक्रम यावर्षी 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे.
26 जुन रोजी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना माहिती मिळाली की, नवापूर पोलीस ठाणे हद्दीतील घोडजामने येथील अल्पवयीन मुलगा व पांघरन येथील अल्पवयीन मुलगी पळून जावून विवाह करणार आहे. सदरची माहिती नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविली. त्यांनी सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करणेबाबत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बारे यांना आदेशीत केले.
त्याप्रमाणे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी नवापूर पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तात्काळ घोडजामने व पांघरन येथे जावून माहिती काढून अल्पवयीन मुलगा व मुलगी तसेच त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाणे येथे आणून अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना बालविवाहामुळे होणारा त्रास व कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. तसेच त्यांनी त्यांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करुन लग्नाचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यानंतरच लग्न करावे याबाबत समजावून सांगून बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
अल्पवयीन मुलगा व मुलगी तसेच त्यांचे आई-वडील यांना सदरची बाब पटल्याने त्यांनी वयाचे लग्नाबाबत कायदेशीर वर्षे पूर्ण झाल्यानंतर व शिक्षण पूर्ण करुनच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगा व मुलगी व त्यांच्या पालकांना नवापूर पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.
ऑपरेशन अक्षतांतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात येत आहे. सुज्ञ नागरिक गोपनीय पध्द्तीने जिल्हा पोलीस प्रशासनाला होत असलेले बालविवाहाबाबत माहिती देत असून बालविवाह रोखण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत तब्बत आतापावेतो एकुण 30 बालविवाह रोखण्यात यश आले आहे असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा. पोलीस उप निरीक्षक युवराज परदेशी, पोलीस अंमलदार गणेश बच्छाव, महिला पोलीस अंमलदार भारती आगळे यांनी केली आहे.








