अक्कलकुवा l प्रतिनिधी
सामान्य प्रशासन विभागाचा दि. 27 जुलै 2015 रोजीचा शासन निर्णय अन्वये मा.लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यक्रमासाठी बोलाविणे व त्यांना सन्मान पुर्वक तसेच सौजन्याची वागणूक देणे बाबत नियमावली लागू केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांना विधान परिषद सदस्य यांना निमंत्रित करतांना त्यांना पूर्व सूचना देणे अभिप्रेत आहे. मात्र नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी मीनल करनवाल हया कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत नाव टाकतात परंतु राजशिष्टाचाराचे पालन करीत नाही अशी तक्रार विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडे केली आहे.
आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांना प्रत्यक्ष भेटुन दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,शासकीय कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींना बोलाविणे व त्यांना सन्मान पुर्वक तसेच सौजन्याची वागणूक देणे बाबत शासनाने सामान्य प्रशासन विभागाचा दि. 27 जुलै 2015 रोजीचा शासन निर्णय अन्वये नियमावली लागू केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांना त्या त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य यांना निमंत्रित करतांना त्यांना पूर्व सूचना देणे अभिप्रेत आहे.असे असतांना मात्र नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी मीनल करनवाल ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत आपले नाव टाकतात परंतु राजशिष्टाचाराचे पालन करीत नाहीत ते कार्यक्रमाची कोणतीही पुर्व सुचना अथवा निमंत्रण देत नाहीत आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य आहोत तर राज्यात भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाचे सरकार आहे.त्यामुळे ते विशिष्ट हेतुने निमंत्रण देत नाहीत.
वास्तव पाहता शासकीय कार्यालय हे कुण्या एका पक्षाचे कार्यालय नसून ते जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्यालय असते. जनतेचे प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी हे कार्यरत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रशासकीय भूमिका बजावतांना प्रामाणिकपणे भुमिका वठवणे अपेक्षित आहे. परंतु प्रकल्प अधिकारी व त्यांचे कार्यालय मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाची भूमिका या ठिकाणी बजावत असून एका आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत अपमानकारक वागत असुन लोकप्रतिनिधी यांना असलेल्या विशेष अधिकार व हक्काचा भंग करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वर कार्यवाही करण्याची मागणी आ. आमश्या पाडवी यांनी केली आहे .सदर बाब आ.आमश्या पाडवी यांनी विधानपरिषदेच्या उप सभापती ना. डॉ. निलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर सदर बाब ही गंभीर असून यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आ. पाडवी यांना दिले आहे.