नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नतीचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत अनेकदा करण्यात आली होती.त्यानंतर शिक्षण विभागाने कालअखेर जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबाबत जि. प.सदस्य आक्रमक झाले होते. त्यानंतर अखेर प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक तसेच पदवीधर शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी दि.२० एप्रिल रोजी आयोजित पदोन्नती समितीच्या बैठकीत मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.
सदर पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यासाठी काल जि.प.च्या याहा मोगी सभागृहात समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.युनूस पठाण व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक मिलिंद जाधव व उमेश पाटील, कनिष्ठ सहाय्यक परेशकुमार वळवी, सुनिल गिरी, प्रशांत गोसावी व स्वप्निल पाटील, संगणक चालक आसिफ पठाण व योगेश रघुवंशी कार्यालयीन कर्मचारी शितल भदाणे यांनी परिश्रम घेतले.
सदर पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविण्यात आल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत पदोन्नती मुख्याध्यापक संवर्गाच्या रिक्त असलेल्या ६७ पदांपैकी नंदुरबार तालुक्यात १०, नवापूर तालुक्यात ४, शहादा तालुक्यात २२, तळोदा तालुक्यात १०, अक्कलकुवा तालुक्यात ९ व धडगांव तालुक्यात ५ अशी एकूण ६० रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबवुन पसंतीने पदस्थापना देण्यात आली.
दरम्यान याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीचे यश आले असून त्यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता.याबाबतचे निवेदन ही अनेकदा दिले होते.