नंदुरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचे सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षणात तब्बल ३ कोटी ३४ लाख ७९ हजार ४९३ रुपयांची अनियमितता झाल्याचे सदरच्या आदेशात नमुद करीत चौकशी अहवालानुसार त्या-त्या काळातील संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत सन २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखा परीक्षणात झालेल्या विकासकामात अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत न्यायालयात देखील रिपिटीशन दाखल झाले आहे. दरम्यान, चौकशीअंती त्या-त्या कालावधीतील ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यास जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत एकूण ३ कोटी ३४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निधीची अनियमितता झाली आहे.
सन २०१६-१७, सन २०१७-१८, सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये आक्षेपाधिन ठेवलेली रक्कम ३ कोटी ३४ लाख ७९ हजार इतकी आहे. सदर रक्कम अनियमितता घोषीत करुन त्यास लेखा परीक्षणात नमूद केल्याप्रमाणे त्या-त्या कालावधीतील सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार जबाबदार आहे. त्याचप्रमाणे सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये वसूल पात्र रक्कम १० लाख ८७ हजार ७७५ इतकी आहे. यास देखील त्या कालावधीतील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार जे.एस.बोराळे (तत्कालिन प्रशासक तथा कृषी अधिकारी, अक्कलकुवा पं.स.), एम.आर.देव (तत्कालिन प्रशासक तथा तत्कालिन विस्तार अधिकारी), व्ही.बी.जाधव (तत्कालिन ग्रामाविकास अधिकारी), उषाबाई बोरा (तत्कालिन सरपंच), आनंदा पाडवी (तत्कालिन ग्रामविकास अधिकारी), ५ टक्के पेसा अंबंधनिधी अंतर्गत अक्कलकुवा, मिठ्याफळी व मक्राणीफळी ग्रामकोष समितीचे संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, समिती अध्यक्ष व सदस्य.यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.









