नंदुरबार | प्रतिनिधी
येथील तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत व शेतकरी आत्महत्या प्रकरणातील शेतकर्यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश व नवीन शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका वितरण आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खा.डॉ. हिना गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, डोकारे येथील आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार नितीन पाटील, राजेश अमृतकर, बी. ओ. बोरसे, रिनेश गावित आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीमध्ये विज पडून मयत झालेल्या ढंढाणे येथील शेरसिंग चंदू भिल यांचे वारस रीनाबाई शेरसिंग भिल तसेच बलवंड येथील मयत शेतकरी युवराज ओंकार पानपाटील यांचे वारस हिराबाई युवराज पानपाटील व खोडामळी येथील मयत शेतकरी किरण यशवंत पाटील याचे वारस सुनंदाबाई किरण पाटील, यांना मदतीचे धनादेश, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत २८ लाभार्थ्यांना वीस हजार रुपये प्रमाणे तसेच नवीन दहा शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत,खा. डॉ.हीना गावीत, डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.गावीत यांनी सांगितले की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते,शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा त्या कुटुंबाला आधार देण्याचे काम सरकार करत असते.या मदतीच्या रकमेचा उपयोग चांगल्या कामासाठी व सत्कारणी लावावा व विविध शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले. खा.डॉ.हीना गावीत यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तहसलिदार भाउसाहेब थोरात यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार नितीन पाटील तर आभार नायब तहसीलदार रिनेश गावित यांनी मानले.








