नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला कालपासून सुरूवात करण्यात आली आहे. काल पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला ५३३ परीक्षार्थींनी दांडी मारली.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देत आढावा घेतला.दरम्यान, २७ परीक्षा केंद्रांवर काल १६ हजार १८२ परीक्षार्थींनी इंग्रजीचा पेपर दिला.कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत वातावरणात पहिला पेपर पार पडला.
जिल्ह्यातील २७ परीक्षा केंद्रांवर १६ हजार ७४८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.तसेच ऐनवेळी प्रविष्ठ झालेले सात विद्यार्थी असे एकूण १६ हजार ७१५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.परीक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर उपद्रव घडू नये,यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.एकूण २७ केंद्रांवर ३०० पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.