नंदुरबार | प्रतिनिधी
राज्यातील ३६ जिल्हे व १५० तालुक्यांमध्ये शाहू फुले व आंबेडकरांचे विचारांचा प्रसार,प्रचार करीत ९ लाख ५० हजार सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सदस्य नोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के यांनी दिली.
नंदुरबार येथे राष्ट्रवादी माजी सैनिक सेलतर्फे महाप्रबोधन यात्रा नंदुरबार येथे आली असता. पत्रकारांशी संवाद साधतांना श्री.शिर्के बोलत होते. ते पुढे म्हणाले की,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर वर्ष सुरू असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ३६ जिल्हे व १५० तालुक्यांमध्ये शाहू फुले व आंबेडकरांची विचारधारा पोहचविण्यासाठी तसेच महापुरूषांचे विचार तळागळात पोहोचविण्यासाठी महाप्रबोधनयात्रेला दि.१० फेब्रुवारी रोजी पुणे येथे सुरूवात झाली ती आज नंदुरबार येथे पोहोचली आहे.
या यात्रेनिमित्त राज्यात भाजपातर्फे शेतकर्यांचे च सैनिकांचे कैवारी आम्हीच आहोत, असे बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व नागरीकांची दिशाभूल करण्यात येत आहे. मात्र शरदचंद्र पवार यांनीच शेतकरी व सैनिकांसाठी काम केलेले आहे. दरम्यान राज्यात ९ लाख ५० हजार माजी सैनिक असून त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली आहे. माजी सैनिक सेलतर्फे राज्यभर महाप्रबोधनयात्रा काढण्यात येत आहे. यामध्ये महापुरूषांची बदनामीला आळा घालण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबत माजी सैनिकांची सदस्य नोंदणीही करण्यात येत आहे. यावेळी विरसैनिक, युध्दवीर, वीर माता पिता, वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात येत आहे. दि.९ एप्रिल रोजी पुणे येथे महाप्रबोधन यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
या प्रबोधन यात्रेतून महापुरूषांचे विचार तळागापर्यंत पोहचविण्यात येत असून लोकशाही मजबूतीसाठी राष्ट्रवादीला स्वबळावर एकहाती सत्तेसाठी प्रयत्न करीत असल्याचे माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अभ्यासक संभाजीराव मोहिते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा आदी उपस्थित होते.








