नंदूरबार l प्रतिनिधी
“ए यार सुन यारी तेरी” दोन जिगरी मित्रांच्या अनोख्या यारीच्या गाभ्यावर तयार केलेले हे फिल्मी गीत अनेक मित्रांना आपल्या आयुष्यात गावेसे वाटते. मात्र; आपण या जगाची एक्झिट घेतल्यानंतर लोकांनी हे गीत म्हणावे, अशा पद्धतीने जीवन जगणारेही अनोखे मित्र या जगात कमी नाहीत. त्यातलाच एक अनुभव नुकताच नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील दोन मित्रांच्या एक्झिट नंतर चर्चेत आला.
नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथील कै. नथ्थूलाल बाबुलाल चौधरी ( जन्म ०१/०६/१९३९) आणि कै. महेंद्रलाल शंकरलाल गुजराथी (जन्म ०१/०३/१९४३) हे दोन मित्र. तसे त्यांच्या वयात चार वर्षांचे अंतर. मात्र: यांची यारी सबंध पंचक्रोशीत प्रख्यात. दोघी मित्रांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करत बालपण घालवलं. वयात आल्यानंतर उदरभरणासाठी दोघांनी वेगवेगळ्या व्यवसायांना सुरुवात केली. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने थोडक्या भांडवलात सुरु करता येण्यासारखे व्यवसाय त्यांनी निवडले.
अगदी १९५०-६० च्या दशकात कै. नथ्थूलाल चौधरी यांनी कोपर्ली येथे पानठेला सुरु केला, तर कै. महेंद्रलाल गुजराथी यांनी लहानशी हॉटेल टाकून व्यवसायाचा श्री गणेशा केला.
दोघांचा संसार हळूहळू वाढू लागला. दोघांच्या संसारवेलीवर फुले उमलू लागली. चौधरी यांना चार मुले आणि एक मुलगी तर महेंद्रलाल गुजराथी यांना दोन मुले आणि दोन मुली अशी आपत्ये झाली. जसजशी परिवारातील सदस्यांची संख्या वाढत गेली तसतसे घरातील खर्चही वाढत गेले. मग व्यवसाय वृद्धीसाठी दोघांनी बरोबरीनेच प्रयत्न सुरू ठेवले.
घरातील मुले करती-कमावती झाल्यानंतर त्यांनाही व्यवसायात जोडून त्यांचेही संसार उभे करण्याचे काम दोघांनी चोखपणे पार पडले. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यापासूनच व्यवसायातील चढउतारांमध्ये एकमेकांना मदतीचा हात देत प्रगतीचा खडतर मार्ग या दोघांनी अत्यंत इमानदारीने सुरूच ठेवला. आता दोघांचे परिवार शिशिर ऋतूतील हिरवळीसारखे नटले. कै. नथ्थूलाल चौधरी यांची मुले प्रकश अण्णा वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पान दुकान चालवत असतानाच राजकारणात सक्रीय झाले. अगदी ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच पदापर्यंत त्यांनी त्यात मजल मारली. त्यांचा तिसरा मुलगा वसंत आणि चौथा मुलगा रवी यांनी मंडप डेकॉरेटर्सचा व्यवसाय सुरु केला.
व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी थेट नंदूरबार शहरात येऊन भाड्याच्या घरातून व्यवसायाला सुरुवात केली. गेल्या तीस वर्षात त्यांनी नंदूरबार जिल्ह्यात प्रीती मंडप डेकोरेटर्स या त्यांच्या फर्मचे नावलौकिक केले. त्यांचे प्रीती साऊंड सर्विस हे प्रतिष्ठाण नंदुरबार जिल्ह्यातील नव्हे तर आसपासच्या दोन्ही राज्यातील मोठमोठ्या सभा संमेलनांना साऊंड सिस्टीम पुरविणारे एकमेव केंद्र बनले आहे. याच काळात वसंत चौधरी यांनी बांधकाम क्षेत्रात पाउल थेन त्यातही नावलौकिक मिळवले आज त्यांच्याकडे लहान शहादा येथील नायरा पेट्रोल पंप आणि ठिकठिकाणी बांधकाम व्यावसायिक म्हणून सुरु केलेले बांधकाम प्रकल्प आहेत. वसंत चौधरी हे नाव आज नंदूरबार शहरातील प्रमुख व्यावसायिकांमध्ये गणले जात आहे. यासर्वातच कै. नथ्थूलाल चौधरी यांनी दिलेल्या संस्कारांचे आणि मुलांच्या संगोपनासाठी घेतलेल्या परिश्रमाचे फलित दिसून येते.
दुसरीकडे कै. महेंद्रलाल गुजराथी यांची मुलेही उच्च शिक्षित झाली. काही काळ शहरात राहून नोकरी करणाऱ्या मुलानाही अखेर गुजराथी यांनी मुळ गावातच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. दोन्हीपैकी मोठ्या हितेन्द्र्ने गावातच भाड्याच्या जागेत किराणा दुकान सुरु केले तर लहान्या विजयने वडिलांच्या हॉटेल व्यवसायास हातभार लावायला सुरुवात केली. दोघा भावांनी केलेल्या अथक परीश्रमानंतर आज या दोघांची गावच्या बाजारपेठेत स्व मालकीच्या जागेत हॉटेल आणि किराणा दुकान डौलात उभी आहेत. पंचक्रोशीतील नागरिकांना योग्य दरात उत्तम प्रतीचा माल पुरविण्याचे त्यांचे सुरु असलेले काम नेहमीच सर्वांना कै. महेंद्र्काका यांची आठवण करून देत राहील.
हे सर्व होत असतांना दोघा मित्रांनी आपापल्या व्यावसायिक चातुर्यातून कै. नथ्थूलाल चौधरी यांनी आप्पा तर कै. महेंद्र्लाल गुजराथी यांनी महेंद्रकाका या नावाने परिसरात आपला नावलौकिक केला. मुलांच्या नामकरणापासून शिक्षण, विवाह, व्यवसाय उभारणी अश्या प्रत्येक गोष्टीत सल्लामसलत करून निर्णय घेणे मात्र सुरूच होते. अगदी एकमेकांच्या घरातील आजारपणात आजारी व्यक्तीला कोणत्या दवाखान्यात न्यावे, शहरात मुलांच्या राहण्याची सोय कुठे करावी आणि मुलांचे विवाह कुठे आणि कसे जुळवावेत ? याबाबतही त्यांनी प्रत्येक वेळी चर्चा केली. एवढेच काय तर पंचक्रोशीतील नागरिकांचे भांडण तंटे, सगे – सोयरिक यांचे व्यवहार आणि देणे – घेणे अश्या सर्वच बाबतीत त्यांनी एकत्रितरीत्या सल्ला देऊन आपल्या मैत्रीची प्रचिती दिली.
आता दोघांचेही नातवंडांशी खेळण्याचे वय असतानाच दोघांनी जणू एकत्रितरीत्या जगाची एक्झिट घेण्याचा विचार केला. दिनांक ६ फेब्रुवारी रोजी कै. नथ्थूलाल चौधरी यांनी हृदयविकाराच्या अल्पशा झटक्याने या जगाचा राम राम केला. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून कै. महेंद्रलाल गुजराथी अत्यंत व्यथीत झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांनी अश्रूंच्या धारा वाहिल्या आणि “आता माझा मित्र गेला, माझ्याशी गप्पा मारायला येथे कोणी उरलं नाही, म्हणून आता मलाही जावं लागेल !” अशा शब्दात त्यांनी आपल्या आप्तेष्टांसमोर आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या आणि आश्चर्य म्हणजे चोवीस तासांत त्यांनीसुद्धा या जगाचा निरोप घेतला.
अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या सुहाग चित्रपटातील “ए यार सून यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यारी है” या गीताच्या बोलांना आचरणात आणत; या मित्रांनी या जगाचा निरोप घेतला. दोघा मित्रांनी चोवीस तासांत आयुष्याला अलविदा म्हटलं आणि जगातून एक्झिट घेतली. दोघांनी गरीबीतील मैत्री कशी असते याचे उदाहरण जगासमोर ठेवले. खरोखर यांची मैत्री पंचक्रोशीतील नागरिकांना पिढ्यानपिढ्या स्मरणात राहील








