नंदूरबार l प्रतिनिधी
धुळे-सुरत महामार्गावर वाहन का थांबविले असे विचारल्याच्या रागातून एका वाहनचालकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बोरविहिर येथील राहूल अशोक चौधरी हे त्यांच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.४८ डी ६३७७) सटाणा तालुक्यातील ब्राम्हणगाव येथून उत्तरकार्य आटपून नवापूर येथे येत होते. यावेळी चरणमाळ घाटातील रस्त्यावर भिमू गिबा गावित याने त्याच्या ताब्यातील वाहन (जी.जे. ०५ जेबी ६५६७) रस्त्यावर थांबविले.
यावेळी राहूल चौधरी यांनी वाहन का थांबविले, काय झाले असे विचारले. याचा राग आल्याने राहूल चौधरी यांना भिमू गिबा गावित, सुनिल रमेश गावित, विष्णू परशुराम गावित (तिघे रा.खळीबर्डी ता.नवापूर) व शैलेश विक्रम गावित (रा.रायपूर ता.नवापूर) यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत राहूल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३४१, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.नरेंद्र नाईक करीत आहेत.