नंदूरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर जामली गावाजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरने वाहनाला धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सुनिल रमण बागले, उमेश सुनिल बागले व त्यांच्यासोबत असलेले तीन प्रवासी हे लग्नकार्यायासाठी अक्कलकुवा येथून नैनशेवडी येथे त्यांच्या वाहनाने (क्र.जी.जे.१६ बीबी ५३२३) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होते. यावेळी एका ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.जी.जे.२६ एबी १८२४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून जामली गावाच्या उतारावरील रस्त्यावर वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.
घडलेल्या अपघातात सुनिल बागले, उमेश बागले हे दोघेजण ठार झाले. तसेच त्यांच्यासोबत असलेले तीन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत रमण भावडू बागले यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, २७९, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.