नंदुरबार l
प्रजासत्ताक दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाची अवहेलना होणार नाही व राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जनतेने वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी राष्ट्रध्वजाचा उपयोग करावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा.
प्लॅस्टिक ध्वज विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 कलम 2 नुसार कार्यवाही करावी.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा व वरील दुर्लक्षामुळे त्याचा अवमान होऊ नये म्हणून जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळी,सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाचा वापर होणार नाही व अशा वापरास पायबंद घालावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.