नंदुरबार l प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने महत्तपुर्ण निर्णय घेतला आहे . राज्यभरात १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे . या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून दि. २० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे .
या कालावधीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये , तसेच सार्वजनिक ठिकाणी वर्तणूकीबाबत , वाद्य वाजविणे व सभेचे आयोजन , त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत , लाऊड स्पीकर वापरणेबाबत योग्य निबंध व निर्देश देण्याचे अधिकार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे . असे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे . सार्वजनिक ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणूकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणूकास निबंध घालण्याचे अधिकार , सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे , गाणी गाणे , ढोल ताशे वाजवणे इत्यादीवर निबंध घालण्याचे अधिकार , रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था टेवण्यासाटी निर्देश देण्याचे अधिकार , सार्वजनिक ठिकाणी , रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजवण्यावर निबंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार , तसेच कलम ३३ , ३५ ते ४० व ४५ मुंबई पोलीस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत . दरम्यान , सदर आदेश लागू असताना सभा , वाद्य वाजवणे , लाऊड स्पीकर वाजवणे , घोषणा देणे , संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी . तसेच सर्व याबतीत पोलीस ठाणे अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे , अशा सूचना देण्यात आल्या आहेत .