नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं डाब हे गाव आदिवासी संस्कृतीचे उगमस्थान म्हणून सर्व दूर परिचित आहे.या परिसरात आदिवासींचे समाज दैवत म्हणून राजा पांठा,गांडा ठाकूर, देव मोगरा माता यांच्यापासून तर त्यांचे अतिशय महत्वाचे सण असलेली होळी आणि दिवाळीचा संबंधही डाब या गावाशी जोडला गेला आहे. आदिवासीं समाजाचे दैवत राजा पांठा त्याचबरोबर गांडा ठाकूर यांच्यामुळे गाव दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने सुरू झाल्याची कथा सर्व दूर परिचित आहे. राजा पांठा आणि गांडा ठाकूर हे राज्याचा फेरफटका मारायला निघाले त्यावेळेस रात्री मुक्कामाला ते प्रवासात ज्या ज्या ठिकाणी थांबले त्या त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जात असे.
त्यालाच गाव दिवाळी म्हणण्याची परंपरा पुढे येऊन सुरू झाली. एकदा गावात त्या दोघांच्या उपस्थितीत नरबळी दिला जात होता. तेव्हा हा मान आम्हाला द्यावा अशी विनंती दोघांनी केली त्यातून या दोघांनी वृद्धाची सुटका करीत यापुढे रेड्याचा बळी द्यावा असे फर्मान काढले. व नरबळीची परंपरा थांबविली.कालांतराने या गाव दिवाळीचे हळूहळू स्वरूप बदलत गेले.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्रानी तालुक्यात असलेले अस्तंबा ऋषी चा डोंगर हा सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चार हजार फूट उंचीवरील एक महत्त्वपूर्ण असे ठिकाण आहे. याला मध्य प्रदेश गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमा लागून आहेत. त्यामुळे या सीमेवरच लागून असलेले हे आदिवासींचे अतिशय महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. महाभारतातील चिरंजीवांपैकी अश्वत्थामा हे एक चिरंजीव मानले जातात. दिवाळी, धनत्रयोदशी ते भाऊबीज या काळात येथे मोठी यात्रा भरते. हजारो भाविक या यात्रेच्या ठिकाणी येत असतात लक्ष्मीपूजनाला या यात्रेचा समारोप होतो. त्यानंतर याच ठिकाणी गाव दिवाळीचा पहिला उत्सव ही पार पडत असतो.व येथूनच गावडदिवाळीला सुरुवात होत असते.
ज्या गावात गाव दिवाळी असते त्या दिवशी गावात करमणुकीचे कार्यक्रम होतात आजूबाजूच्या गावातील लोक येत असतात. त्याच बरोबर गाव दिवाळी हा कार्यक्रम होणे आधी साधारणतः पंधरा दिवस ते महिना आधी सर्वदूर या बाबत माहिती दिली जात असते.त्यामुळे सर्वांना गाव दिवाळी कोणत्या दिवशी आहे याबाबत कल्पना आधीच प्राप्त झालेली असते.
त्यामुळे उत्सव असलेल्या गावात बाहेर गावाचे बरेच पाहुणे हे येत असतात त्याचबरोबर गावातील आदिवासी समाजातील सासरी गेलेल्या मुलीही पुन्हा आपल्या गावाकडे वळत असतात. त गावकरी न कपडे परिधान करून गावात फेरफटका मारत असतात. गावात अनेक व्यावसायिक आपली दुकाने थाटतात त्यामुळे गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. पूर्वी ही दिवाळी झाडाझुडपात व्हायची आता गावाच्या सीमेवर बहुदा गावातच ही होत असते.
तत्पूर्वी गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेव, डोंगऱ्या देव, शिऱ्या देवाची एकत्रित पूजा केली जाते. पूजा झाल्यानंतर गावाचा प्रमुख याच्या हस्ते आधी रेडा किंवा कोंबड्याची मान कापली जाते उरलेले मासे गावात प्रसाद म्हणून वाटले जाते गावातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी सोंगाड्या पार्टी बोलविली जाते जी पार्टी रात्रभर आदिवासी गीते त्याचबरोबर नृत्य व नाटकावर आधारित आपली कला संस्कृती या ठिकाणी सादर करीत असते.
या गाव दिवाळीत ह्या आदिवासींच्या कला उत्सवाला मोठे महत्त्व असते. हा उत्सव पाहण्यासाठी बरेच लोक या ठिकाणी जमत असतात त्यामुळे ज्या गावात ही दिवाळी साजरी होते त्या गावाला यात्रेचा स्वरूप प्राप्त होत असतं पूजा आणि सोंगाड्या पार्टीसाठी लागणारा खर्च हा गावातील लोकांकडूनच गोळा केला जातो.व हा कार्यक्रम सादर होत असतो .
मनोरंजना बरोबर हे कलाकार आदिवासी समाजामध्ये जनजागृती, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी साक्षरतेचे कार्यक्रमही करत असतात. या आदिवासी समाजापर्यंत काही साक्षरतेच्या दृष्टीने कार्यक्रम पोहोचवायचे असतील तर शासनाकडून या कलावंतांचा उपयोग केला जात असतो.
गेल्या कोरोना काळामध्ये आदिवासी कलावंतांना हालाखीचे दिवस आले होते. प्रत्येक जण स्वतःला क्वारंटाईन करून घेत असल्यामुळे या कलाकारांना काम उपलब्ध नव्हते. गावातच मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरावी लागत होती. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता अशा ठिकाणी दिवाळी छोट्या प्रमाणात साजरी होत होती पण या कलाकारांना उदरनिर्वाहासाठी ती पुरेशी नव्हती.
आता कोरोना कालावधी संपल्यामुले या कलाकारांना पुन्हा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. अश्वत्थामा यात्रा संपल्यानंतर या कलाकारांना बरीचशी आमंत्रण येऊ लागली आहेत याच आमंत्रणाचा एक भाग म्हणून येत्या ६ डिसेंबर २०२२ रोजी बोरद या गावी गाव दिवाळी आयोजित करण्यात आली आहे. या गाव दिवाळीमध्ये परिसरातील लोकांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ही दिवाळी निश्चितच मोठी होणार याबाबत कुठली शंका नाही. ह्या दिवाळी संदर्भात परिसरातील अनेक गावांमध्ये आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे. यावरून आता या कलावंतांना ही सुगीचे दिवस येऊ लागले आहेत हे निश्चित.