नंदूरबार जिल्ह्यातील अपूर्ण स्टाफमुळे माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू,आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा
नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात आरोग्य विभागाचा बोजवारा उडाला असून नंदुरबार व धडगाव येथील महिला रुग्णालय हे केवळ कागदावरच कार्यरत असून तज्ञ डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफचा अभाव असल्याने आजही नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू होत असल्याचा आरोप करत, राज्य सरकारने राज्यातील आरोग्य विभागाचा बजेट १० टक्क्यांच्या वर करावा, अशी मागणी आम आदमी पार्टी आरोग्य विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.संतोष करमरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, २६ जानेवारीपर्यंत आरोग्य सेवेत सुधारणा झाली नाही तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नंदूरबार येथे आम आदमी पार्टी आरोग्य विभागाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी डॉ.संतोष करमरकर म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व धडगाव येथील अत्याधुनिक महिला रुग्णालयांचे उद्घाटन चार वर्षापुर्वी दिमाखात करण्यात आले. मात्र, हे दोन्ही रुग्णालये केवळ कागदोपत्री सुरु असून इमारतींची दूरवस्था झाली आहे.
याबाबतची माहिती कळल्यानंतर आम आदमी पक्षाच्या सत्यता पडताळणी टीमने प्रत्यक्ष भेट दिली. या टीममध्ये आम आदमी पक्षाच्या आरोग्य विभागाचे डॉ.जयवंत महाले, डॉ.शरद बोडके व आप पदाधिकारी चंदन पवार यांचा समावेश होता.
नंदुरबार व धडगाव येथील महिला रुग्णालय हे केवळ कागदावरच कार्यरत असल्याचे आणि तज्ञ डॉक्टर, डॉक्टर, परिचारिका इतर स्टाफ यांचा अभाव दिसून आला. परिणामी आजही नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मातामृत्यू आणि अर्भक मृत्यू होत आहेत.
नंदुरबार आणि धडगाव यासारख्या दुर्गम भागामध्ये मंजूर झालेल्या या दोन महिला रुग्णालयांमध्ये शल्यचिकित्सक, महिला व प्रसुतीतज्ञ, बालरोग तज्ञ यांच्यासह महिला व बाल आरोग्य सेवा देण्यासाठी पुरेशी साधनसामग्री, कर्मचारी यांची उपलब्धता आवश्यक आहे.
आवश्यक तज्ञ मनुष्यबळ व साधनसामग्री यांच्या अभावामुळे होणारे माता व अर्भक मृत्यू हे मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष, शासकीय प्रशासकीय निष्काळजीपणा यामुळे नंदुरबार व धडगाव पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मातामृत्यू होत आहेत. कार्यरत नसलेली नंदुरबार व धडगाव येथील महिला रुग्णालये ही याचे प्रमुख कारण आहे, असा आरोप त्यांनी केला.
डॉ.करमरकर म्हणाले, आरोग्य सेवेची ओरड ही केवळ नंदुरबार जिल्हयातच नाही तर संपुर्ण राज्यात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर राज्याचा आरोग्य विभागाचा बजेट ४.६ टक्क्यांवरुन १० टक्क्यांवर आणण्याची गरज आहे.
सदर बजेट लहान लहान राज्यांमध्येच १३ टक्क्यांवर आहे. दिल्लीत १४.६ टक्के बजेट आहे. त्यामुळे नागरिकांना सेवा पुरविणे सोपे जाणार आहे, असेही ते म्हणाले.
डॉ.करमरकर म्हणाले, धानोरा येथे ग्रामीण रुग्णालयाची अत्याधुनिक इमारत तयार आहे. परंतू त्या ठिकाणी ऍनेस्थेसियासाठी बॉईल्स ऍपरेटस नाही. त्यामुळे तेथे एकही शस्त्रक्रिया होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी होते.
साफसफाई केली जात नाही, त्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे, सुरक्षा रक्षक नसतो, त्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, पॅथालॉजी लॅब नाही, त्यामुळे आरोग्य सेवेचा गंभीर प्रश्न आहे. जिल्हयातील आरोग्याच्या समस्या दि.२६ जानेवारीपर्यंत न सुटल्यास आम आदमी पार्टीतर्फे रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडण्याचा इशाराही डॉ.करमरकर यांनी दिला.
यावेळी मराठवाडा विभागाचे डॉ.शरद बोडके, प्रसिद्धीप्रमुख चंदन पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बिपीन पाटील, जिल्हा समन्वयक रवि गावित, शेतकरी संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष सावळीराम कारे, शेतकरी संघटना जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.








