नंदूरबार l प्रतिनिधी
साखर कारखान्यांनी व गुऱ्हाळ मालकांनी उचल व अतिम बिल रक्कम जाहीर करावा याबातचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तळोदा तहसिलदार गिरीश वखारे यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी व गुऱ्हाळ मालकांनी दि.१६ नोव्हेंबर पर्यत उचल व अतिम बिल रक्कम जाहीर करावा. तसेच ऊसाला पहिली उचल २५०० रुपये व अंतिम बिल ३१०० रुपये त्वरित जाहीर करावे. ऊसाला प्रतिटन ५ हजार पाच रुपये देण्यात यावा. तर कारखान्यांचे वजन काटे तपासण्यात यावेत, तोडणी आणि वाहतूक खर्चामधील गैरप्रकार थांबवण्यात यावा, एकरकमी बिले देण्यात यावेत.
सरकारने जाहीर केलेली एफ.आर.पी.फसवी आहे. गेली दहा वर्षे आम्ही प्रतिटन २ हजार ४०० रुपये घेत आहेत. आता डिझेल, पेट्रोल, खत, मजुरीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सरकारने यातील दोन हजार रुपये आणि एफ.आर.पी.३ हजार ५०० रुपये असे एकूण पाच हजार ५०० रुपये प्रतिटन दर द्यावा. अन्यथा आम्ही कारखाने सुरु होऊ देणार नाही. तसेच तहसिलदार व जिल्हाधिकार्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, साखरमंत्र्यांशी आमची चर्चा घडवून आणावी. तसेच वजनकाटे तपासले जावेत. वाहतूक आणि तोडणी खर्चा कसा आकारला आहे यासंदर्भात समिती नेमून चौकशी केली जावी. एफ.आर.पी.हा केंद्र शासनाच्या अखत्यारितला विषय आहे. याबाबत राज्य शासनाशी चर्चा करण्यासाठी शेतकरी व संघटनेची बैठक घडवून आणावी.
जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी ऊस दरासाठी विविध ठिकाणी आंदोलने होणार असल्याने शेतकरी वर्ग आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर येऊन ऊसाची वाहतूक रोखणे, टोळ्या बंद करणे, रस्ता रोको आंदोलन करणे अशा प्रकारे वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे व साखर कारखानदाराचे व सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. साखर सम्राटांनी योग्य भूमिका घ्यावी अन्यथा दि.२२ नोव्हेंबर पासून आंदोलन तीव्र करून कारखानदारांना सळो की पळो करून सोडू. तळोदा तालुक्यातील एकही कारखाना चालू राहणार नाही असा इशारा दिला. शेतकर्यांचा कोणी वाली राहिला नाही त्यामुळे सदरील कालावधीत शेतकरी संघटनेचे व एकलव्य आदिवासी युवा संघटनेची चर्चा घडवून आणावी अन्यथा दि. २८ नोव्हेंबर २०२२ पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड.गणपत पाडवी, सचिव फतेसिंग दादा, सुनील दादा, शंकर वळवी, टेडग्या वळवी, अरुण वसावे, रोहित वळवी, सुनिल वळवी, किरण नाईक, विकास ठाकरे आदी उपस्थित होते.