नंदुरबार । प्रतिनिधी
पुर्वी मिठावर कर लावणार्यांना देश सोडावा लागला होता, आता पिठावर कर लावणारे सरकारही लवकरच जाईल, असा विश्वास माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ.थोरात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री अॅड.के.सी.पाडवी, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.शिरीषकुमार नाईक, जि.प.अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, रणजीत पावरा, सभापती रतन पाडवी, अजित नाईक, जि.प.सदस्या हेमलता वळवी, नगरसेवक गौरव वाणी, जितेंद्र सूर्यवंशी, बापू कलाल आदी उपस्थित होते.
दरम्यान, आझादी गौरव पदयात्रेला येथील कृषि उत्पन्न बाजार समितीपासून सुरुवात करण्यात आली. महाराणा प्रताप पुतळयाला आ.थोरात यांच्यासह माजी मंत्री अॅड.के.सी.पाडवी, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.शिरीषकुमार नाईक, जि.प.अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, रणजीत पावरा आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर सदर पदयात्रा बसस्थानक, नेहरु पुतळा, गांधी पुतळा, शहिद शिरीषकुमार स्मारक, नगरपालिका, दीनदयाल चौक या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात आली. यावेळी नाटयमंदिरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
यावेळी बोलतांना आ.बाळासाहेब थोरात म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऑल इंडीया काँगे्रस कमिटीतर्फे दि.9 ते 15 ऑगस्टदरम्यान 75 किमी पदयात्रा देशातील प्रत्येक राज्यात, जिल्हयात, गावागावात आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार ही शहिदांची भुमी आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी मला विशेष निरोप पाठवून नंदुरबार जिल्हयात आझादी गौरव पदयात्रा काढण्याचे सुचित केले. कारण इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहूल गांधी यांचा नंदुरबार हा आवडता जिल्हा आहे. या जिल्हयातील नेत्यांनी जिल्हयात चैतन्य निर्माण करण्याचे काम केले आहे. जिल्हयानेही काँग्र्रेसला साथ दिली आहे. गांधीजींनी देशाला सत्य व अहिंसेची शिकवण दिली.
देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर घटना लिहिली गेली. या घटनेमुळे सर्वांना मुलभूत अधिकार प्राप्त झाले आहेत. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले, देशाची प्रगती केली, आनंद दिला. मात्र, आता देशात काय चालले आहे, याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे. खोटे आश्वासन दिले जात आहेत, भुलथापा दिल्या जात असून समाजासमाजात, धर्मा-धर्मात तेढ निर्माण केले जात आहे.
सत्तेत राहण्यासाठी वाटेल ते प्रयोग केले जात आहेत. महागाई गगनाला भिडली आहे, 300 रुपयांचे गॅस सिलींडर 1100 च्या वर गेले आहे. इंधन दरवाढ झाली आहे, बेरोजगारी वाढली आहे, दूधावर, पिठावरही जीएसटीचा कर लादण्यात आला आहे. पुर्वी मिठावर कर लावणार्यांना देश सोडावा लागला होता, त्यामुळे पिठावर कर लावणारेही लवकरच जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आ.थोरात पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. पुर्वी ईडी, आयटी हे शब्द लोकांना माहिती नव्हते. आता लहान लहान मुलांनाही हे शब्द माहिती झाले आहेत. ईडी, आयटी या स्वायत्त संस्था आहेत. त्यांचा वापर राजकारणासाठी होवू नये, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच या पदयात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला पुन्हा एकदा दिमाखाने उभे करावे, आमच्या काही चुका असतील त्या दुरुस्त करु, काँग्रेसच्या जडणघडणीत नंदुरबार जिल्हयाचा मोठा वाटा आहे, सोनियाचा दिवस आणण्यासाठी तसेच देशात लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन आ.थोरात यांनी केले.
यावेळी माजी मंत्री आ.अॅड.के.सी.पाडवी म्हणाले, स्वातंत्र्य प्राप्तीपासून तब्बल 52 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करणे ही गौरवाची बाब आहे. मात्र, त्याचा वापर राजकारणासाठी होत असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही.
भाजपाचे हे बेगडी राष्ट्रीयत्व आहे. राज्यघटना, लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाभारतातच एकलव्याचा अंगठा कापला होता आता केंद्र सरकारने राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांना विराजमान करुन सरकारला हवे तसे कायदे केले जाणार असल्याचा आरोप करत संघर्षाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. काँग्रेसने अशा प्रकारचे राजकारण कधीच केले नव्हते आणि करणारही नाही. त्यामुळे देशाचे संरक्षण फक्त काँग्रेस पक्षच करु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक दिलीप नाईक यांनी केले. आभार आ.शिरीषकुमार नाईक यांनी मानले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.








