नंदुरबार l प्रतिनिधी
कोरडी मध्यम प्रकल्प धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 236.17 मीटरची नोंद झाली असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असल्याने कोरडी नदीच्या काठावरील पळशी,
पळसून, डोंग,सागाळी, वडदे, खातगाव,वडफळी,बिलदा, डोगेगाव, जामदा, वासदा, चंदापूर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नदी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








