नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या धडगाव तालुक्यातील सुरवाणी आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणावर समस्या असून देखील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. याबाबत सुरवाणी धडगाव येथील आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी थेट तळोदा प्रकल्प कार्यालयावर पायी मोर्चा काढत प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव घालत समस्यांचा पाढा वाचला.
धडगाव सुरवाणी आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात पाण्याची समस्या मोठी असल्याने पिण्याचे पाणी व आंघोळीसाठी अडचण निर्माण होते, वस्तीगृहात विजेचा प्रश्न देखील मोठा आहे, विद्यार्थ्यांना अद्याप डीबीटी मिळालेले नाही.
धडगाव सुरवाणी वस्तीगृहातील सगळ्यात मोठी समस्या म्हणजे इथले अधीक्षक – वार्डन, शिपाई आणि चौकीदार विद्यार्थ्यांच्या समस्या कडे पूर्णता दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांनी समस्या मांडल्यास आम्हाला सांगू नये तुम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जा; अशी उत्तरे वार्डन, शिपाई व चौकीदार यांच्याकडून दिली जातात.
त्यामुळे सुरवाणी आदिवासी वस्तीगृहातील तमाम विद्यार्थ्यांनी वार्डन, शिपाई आणि चौकीदार यांची तात्काळ बदली व्हावी अशी मागणी केली आहे.
पायी मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांनी तळोदा सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी.एफ. वसावे यांना निवेदन सादर केल्यानंतर तत्काळ त्यांनी लेखी आश्वासनाद्वारे वार्डन, शिपाई, चौकीदार यांची बदली करण्याची कार्यवाही केली जाणार तसेच डीबीटी आणि विजेच्या प्रश्नाबाबत सबंधित कार्यालयाशी संपर्क साधून तत्काळ समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेत न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.








