नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे शिवसंपर्क अभियानातर्ंगत मेळाव्यात मार्गदर्शन करतांना माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे मोठा मेळावा होवू शकला नाही. या मेळाव्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून जोमाने कामाला लागावे. विधानसभेला भाजपासोबत युती असतांना आम्ही प्रामाणिकपणे मदत केली.
म्हणूनच डॉ.विजयकुमार गावीत ७० हजार पेक्षा अधिक मतधिक्काने निवडुन आले. मात्र भाजपाने गद्दारी केल्यामुळेच शिवसेनेचा उमेदवार पडला. नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना ४० टक्के आहे. जुलैनंतर दोन पंचायत समितींवर शिसेनेचा झेंडा फडकेल.
नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेसाठी पोषक वातावरण असतांना काही लोकांना क्रेडीट घेता येत नाही. शिवसेना कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नाही. जे जातील त्यांच्याशिवाय जे राहतील त्यांच्या सोबत आम्ही काम करू,
पुढील काळात आम्ही जिल्ह्यातील निवडणुका आघाडी म्हणून लढु मात्र आघाडीतील एखादापक्ष मस्ती करीत असेल तर शिवसेना त्याची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी दिला. जोपर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार निवडुण आणत नाही. तोपर्यंत शांत बसणार नाही. असे सांगत कार्यकर्त्यांनी घराघरात शिवसेना पोहोचवावी. असे आवाहन केले.
उसनवार जिल्हाप्रमुख
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाटय मंदिरात शिवसंपर्क अभियानाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॅनरवर नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांचा फोटो होता.
मात्र ते कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले तर जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचा बॅनवर फोटो नसतांनाही ते कार्यक्रमाला हजर होते. यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यक्रमा दरम्यान आम्ही उसनवार जिल्हाप्रमुख आणला आहे. असे सांगताच एकच हशा पिकली.