नंदुरबार l प्रतिनिधी
ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे मृत्यूचा सापळा ठरलेल्या कोळदा-खेतिया रस्त्याच्या ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाच्या दोषी अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी यांनी केली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास शिवसेनेतर्फे सेनेच्या स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्य शासनाने विसरवाडी ते खेतिया या महामार्गाचे रूंदीकरण व नुतनीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून सुरू केले आहे. पैकी पहिल्या टप्प्यात कोळदा ते खेतिया या रस्त्याचे काम निर्माधाधिन आहे. या रस्त्याचा ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे काम रखडले असुन या रस्त्यावरून मार्गक्रमण करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अनेक नागरीकांना आपले प्राण ही गमवावे लागले आहे. ही अत्यंत शोकांतिका आहे. तापी नदीवरील प्रकाशा येथील पुलापासून ते गावापर्यंत शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूस तसेच दरा फाट्याजवळील सुसरी धरण वळण रस्ता ते चॉंदसैली गावापर्यंतचा रस्त्याचे काम गेल्याअनेक वर्षापासून अपुर्णावस्थेत असल्याने हा रस्ता सध्या तरी वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
गेल्या दिड वर्षात या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून आता पर्यंत ३१ मोठे अपघात झाले असून १०० पेक्षा अधिक किरकोळ अपघात झाले आहेत पैकी १८ नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे डामरखेडा येथील गोमाई नदीवरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. हा पुल कधी ही कोसळु शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्देवाने हा पुल कोसळला तर शहादा प्रकाशा या गावांचा संपर्क तुटू शकतो. परिणामी, या पुलाची दुरूस्ती होणे ही काळाची गरज आहे.
वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरलेल्या या रस्त्याच्या आजच्या परिस्थितीस पुर्णतः ठेकेदार व रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. मुळात, निर्धारित वेळेत या रस्त्याचे काम ठेकेदाराने पुर्ण केले असते तर याचा फायदा गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या तिन्ही राज्यातील नागरीकांना झाला असता.
मात्र ठेकेदार मनमानी कारभार करत असल्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. त्याच प्रमाणे या कामावर देखरेख ठेवत नियमानुसार काम पुर्ण करून घेण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची असतांनाही या जबाबदार अधिकार्यांनी ठेकेदारांच्या चुकांवर पांघरूण घातल्याने हे अधिकारी ही ठेकेदारा इतकेच दोषी आहेत.
निष्पाप नागरिकांचा बळी घेणार्या व मृत्यूचा सापळा ठरलेल्या या रस्त्याच्या ठेकेदार व त्याला संरक्षण देणार्या अधिकार्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन या निष्पाप नागरीकांचा मृत्यूस कारणीभुत ठरलेल्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवसेना नंदुरबार जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, शहादा तालुका प्रमुख राजु लोहार, उपजिल्हा संघटक मधुकर मिस्तरी, तालुका संघटक गणेश चित्रकथे, भगवान अलकारी, दिलीप पाटील, सुरेश मोरे, मुरली वळवी, डॉ.सागर पाटील, विनोद चौधरी, सागर चौधरी, कादीर शेख, बापू चौधरी, अविनाश पाटील, गुलाब सुतार आदींच्या सह्या आहेत.