नंदुरबार l प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी शेतीबाबत असलेले नैराश्य झटकावे आणि शेती आवडीने करावी. शेतीचे दिवस लवकरच पालटणार आहेत. आपल्या देशात दररोज दोन हजार एकर शेती कमी होत चालली आहे.
एक दिवस असा येईल मूठभर सोने घ्या आणि पोतीभर धान्य द्या, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. २०२२ हे वर्ष धान्यासाठी उच्चतम भावाचे राहणार आहे. असे प्रतिपादन कृषी विद्यावेत्ता डॉ. मुरलीधर महाजन यांनी केले.
घोटाणे (ता. नंदुरबार) येथे धुळे विभागीय कृषी विस्तार केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. मुरलीधर महाजन यांचा सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळा परिसरातील घोटाणे, न्याहली, बलदाणे, कार्ली, आसाणे गावातील शेतकऱ्यांनी आयोजित केला होता.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. डॉ. राजेंद्र दहातोंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय विस्तार केंद्राचे प्रा. देसले, कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. उत्तरवार, प्रा. राजेश भावसार, तालुका कृषी अधिकारी स्वप्निल शेळके, मंडळ कृषी अधिकारी पी. एच. धनगर, कृषी पर्यवेक्षक एम. जी. ढोडरे, डी. जी. नागरे, एस. बी. पाटील, कृषी सहाय्यक जी. बी. पाटील तंत्र सहाय्यक पंकज धनगर, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक चंद्रकांत बागुल आदी उपस्थित होते.
डाॅ. महाजन पुढे म्हणाले की, या वर्षापासून धान्याचे भाव सतत वाढत जाणार आहेत. याची चाहूल आपल्याला आतापासूनच लागली आहे. त्यासाठी शासनाला गव्हाची निर्यात बंद करावी लागली आहे. कृषी उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे.
पारंपारिक शेती करणे यापुढे आता चालणार नाही. पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नका. धूळपेरणी तर अजिबात करू नका. निसर्गाला दोष देण्यापेक्षा पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रत, पावसाचा अंदाज याचा सारासार विचार करून पिकांची निवड करावी.
पेरणीचे जास्त टप्पे पडत असल्यामुळे कापसावर बोंडअळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यंदा १ जून नंतरच कापसाचे बियाणे मिळणार आहे. दरवर्षी एका बांधावर कमीत कमी ८ झाडे लावा, असे आवाहनही डॉ. मुरलीधर महाजन यांनी केले.
सेवानिवृत्त होत असलो तरी मी माझा मोबाईल नंबर बदलणार नाही आणि शेतकऱ्यांना सतत मार्गदर्शन करत राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
प्रा. राजेंद्र दहातोंडे, प्रा. देसले, हिंमतराव माळी, हरिश्चंद्र पाटील, आशाबाई गिरासे, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. जी. ढोडरे यांनी केले तर रवींद्र धनगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन संतोष धनगर, हिंमतराव माळी, दंगल धनगर,भटू धनगर, नंदलाल धनगर, ज्ञानेश्वर पाटील, कोमलसिंग गिरासे व घोटाणे ग्रामस्थांनी केले.