नंदुरबार l प्रतिनिधी
जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात पुन्हा एकदा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले.जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी मनमानी करत जलजीवन मिशनसाठी अटी-शर्ती लागू केल्याने जलजीवनची कामे रेंगाळली असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शासन निर्णय नसतांना अटी लागू केल्या कशा? असा सवाल उपस्थित करत जि.प.सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
सर्वसाधारण सभेदरम्यान जि.प.सदस्या हेमलता शितोळे यांनी जलजीवन मिशनसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अटी-शर्ती लागू केल्याने जलजीवन मिशनची कामे रेंगाळली असल्याचे सांगत अटी-शर्ती शिथिल करण्याची मागणी केली. यावर जि.प.उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांना याबाबत यापूर्वी दोनदा विचारणा केली असता त्यांनी तसा शासन निर्णय असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने अभियंता बाविस्कर दोनदा खोटे बोलल्याचा आरोप ॲड.रघुवंशी यांनी केला. यावर जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठी अनुभवाची अट कायम करुन कामे देण्याच्या सूचना दिल्या. यावर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आजपासून ३० वर्षानंतरचे अर्थात २०५३ पर्यंतचा विचार करुन कामे करावयाची असल्याने तशा अटी लागू केल्याचे सांगितले. मात्र यावर सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी सदरच्या अटी शिथिल करण्याचा ठराव करण्याचे सांगत मनमानी करीत अटी लागू करणाऱ्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, कंत्राटी कर्मचारी भरतीत स्थानिकांना डावलण्याचा आरोपही जि.प.सदस्यांकडून करण्यात आला. तिनसमाळ येथील पाणी पुरवठा योजनेंतर्गत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु झाली असून डेब्रामाळ पाणी पुरवठा योजना प्रकरणी ठेकेदार व अभियंत्याचा खुलासा घेवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सीईओ रघुनाथ गावडे यांनी दिली. धडगाव तालुक्यातील भुजगाव धरण सन २००१ मध्ये वाहून गेले होते. यावेळी धरणाच्या कामासाठी ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र ते काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यानंतर कामाची किंमत वाढत आज १ कोटी ३५ लाखांपयंर्त पोहचली असूनही धरणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर जि.प.सदस्य विजय पराडके यांनी ताशेरे ओढले. नवापूर तालुक्यातील पाड्यांवरील टंचाई दूर करण्यात यावी, अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावित यांनी केली. घरकुलांचे फोटो अपलोड करतांना संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशांची सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जि.प.सदस्य दीपक नाईक यांनी केली. तसेच अक्कलकुवा येथील गटविकास अधिकाऱ्यांचा कार्यभार काढण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा जि.प.सदस्य विजय पराडके यांनी दिला. सदरची सभा जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, निर्मला राऊत, गणेश पराडके, अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडली.