नंदुरबार l प्रतिनिधी
समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याचे गाळप मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बंद करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शेतकर्यांनी आपला ऊस तोड करून कारखान्यास द्यावा असे आवाहन संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
याबाबत श्री.सिनगारे यांनी सांगितले, कारखान्याचा २०२१-२२ चा चालू गळीत हंगाम मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बंद करण्यात येणार आहे. कारखान्याने आतापर्यंत ११ लाख ३७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. यासाठी ऊस तोडणी व वाहतूक कारखान्याच्या यंत्रणेमार्फत करण्यात आली. कारखाना सुरू ठेवण्याची कारखाना व्यवस्थापनाची प्रबळ इच्छा आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे ऊस तोडणी मजूर संख्या घटली आहे. पर्यायाने आवश्यक ती ऊस तोडणी व ऊस पुरवठा होत नाही. कारखान्याच्या ऊस तोडणी व वाहतूक नियंत्रण अभावी ऊस गाळपास पाठवण्यास ऊस उत्पादकांना अडचणी निर्माण होत आहेत. ऊस उत्पादकांना ऊस तोड करण्यास अडचण निर्माण होत असल्यास ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम ३(३) अन्वये कारखान्याच्या उपविधी नुसार स्वतः ऊस तोडणी करून वाहतूक करून कारखाना गेटवर कारखाना बंद होण्यापूर्वी पोहोच करावा. अन्यथा असा कोणताही ऊस गाळपाविना शिल्लक राहिल्यास त्यास कारखाना जबाबदार राहणार नाही. याची कार्यक्षेत्रातील आणि कार्य क्षेत्राबाहेरील उत्पादकांनी नोंद घ्यावी व आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन श्री.सिनगारे यांनी केले आहे.