नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यात काही गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत कामाला सुरुवात झाली नसतांना देखील बिले सादर करण्यात आली आहेत. आजही गावे तहानलेली आहेत. यामुळे संंबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जि.प.सदस्य भरत गावित यांनी जि.प.स्थायी समिती सभेत केला.
नंदुरबार जि.प.स्थायी समिती सभा याहामोगी सभागृहात जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण सभापती अजित नाईक, कृषी सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेदरम्यान, विविध विषय समितींचा आढावा घेत असतांना जलजीवन मिशन अंतर्गत कामे झाली नसतांना बिले सादर करण्यात आली असल्याचा आरोप जि.प.सदस्य भरत गावित यांनी केला. यावेळी ते म्हणाले, जि.प.चे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने भ्रष्टाचार होत आहे. जर योजनेतून कामे पूर्ण होत नसतील तर पदरमोड करुन कामे तयारी असल्याचे भरत गावित यांनी सांगितले. या प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना पाठीशी घालू नये, असे भरत गावित म्हणाले. किमान पाण्यासाठी न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सिंचन विहिरींना अनुदान मिळत नाही. संबंधित शेतकरी व्याजाचे पैसे घेऊन विहिरींचे काम करत असल्याने अनुदान मिळत नसल्याने अडचणीत येत आहेत. त्यामुळे तात्काळ अनुदान अदा करण्यात यावे, अशी मागणी जि.प.सदस्य देवमन पवार यांनी केली. दीपक नाईक यांनी घरकुलांचे छायाचित्र अपलोड करण्यासाठी संबंधित कंत्राटी अभियंता एका वेळेस हजार ते दीड हजार रुपयांची मागणी करत असून चार टप्प्यात सदरची प्रक्रिया असल्याने एका लाभार्थ्यांकडून सुमारे ५ ते ६ हजार रुपये घेतले जात असल्याचा आरोप यावेळी केला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत नुकतीच नवापूर तालुक्याची बैठक घेण्यात आली असून तसा प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच जलजीवन मिशनमध्ये राज्य व केंद्र सरकारचा दोन्हींचा निधी वाटपात वाटा असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींचा विश्वासात न घेता कामांचे भूमीपूजन होत असल्याचा आरोपही दीपक नाईक यांनी केला. वाघाळे येथील पाणी पुरवठा योजना रेंगाळली असून अद्यापही गावापर्यंत पाणी पोहचले नसल्याने अडचणी येत असल्याचे देवमन पवार म्हणाले.








