नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी 24 एप्रिल ते 1 मे 2022 या कालावधीत ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षांतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून ‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिम 24 एप्रिल 2022 ते 1 मे 2022 या कालावधीत देशभरात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी ) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 1 लाख 30 हजार 345 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 3 हजार 703 लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड देण्यात आले असून 26 हजार 642 नोंदणीकृत लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप करावयाचे आहे. यासाठी 24 एप्रिल 2022 रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष ग्रामसभेत प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज वाटप करण्यात येईल.
ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणाच्या समन्वयाने मोहिम राबविण्यात येईल. यानुसार सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याच्या विहित कार्यपद्धतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन 1 मे 2022 पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील. यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारीत पेमेंटसाठी अधिकृत करून घेण्यासाठी संनियंत्रण करावे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्यवस्थापक व कृषि विभागाने 24 एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीकविमा योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी 26 एप्रिल 2022 रोजी गावनिहाय “पीक विमा पाठशाला” चे आयोजन करण्यात येणार आहे. या पाठशाळेमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन “किसान भागीदारी प्राथमिकता हमारी” मोहीम यशस्वी करावी. तसेच या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री व जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक, जयंत देशपाडे यांनी केले आहे.